चासकमानचे पाणी पेटले; 65 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल

chaskaman
chaskaman

शिक्रापूर (पुणे) : चासकमान कालव्याच्या शिरूर तालुक्‍यातील कोरेगाव- धानोरे शाखेला चार दिवसांपूर्वी पाणी सोडलेल्या शिक्रापूर परिसरातील महिलांसह 65 शेतकऱ्यांवर सरकारी कामात अडथळ्याचे गुन्हे नुकतेच शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाले. शेतकऱ्यांशी चर्चा करून, पाणी काही अंशी बंद करीत प्रशासनाकडून सहकार्य करण्याची जाहीर भूमिका व्यक्त होऊनही गुन्हे दाखल झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यामुळे शासकीय कामात हलगर्जीपणा केल्याचे गुन्हे पाटबंधारे खात्यातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दाखल करण्यासाठी आता आंदोलनाची तयारी सुरू केल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. 

पाणी नियोजनासाठी आवश्‍यक कालवा समितीच्या बैठकीबाबत पाटबंधारे खात्याने काहीच भूमिका घेतली नाही. त्यातून चासकमान कालव्याचे पाणी आवर्तन 13 एप्रिलपासून सुरू केले. त्यामुळे पाटबंधारे खात्याकडे 25 एप्रिलपासून "पाणी द्या' म्हणून शिक्रापूर परिसरातील दहा गावांतील शेतकरी सातत्याने पाठपुरावा करीत होते. मात्र, प्रत्येक वेळी पुढच्या तारखा देत पाटबंधारे खात्याने चालढकल केली. अखेर शेतकऱ्यांनी 5 मे रोजी बेमुदत उपोषण सुरू केले. त्यामुळे धानोरे- कोरेगाव कालवा शाखेवर 10 मे रोजी पाणी देण्याची लेखी ग्वाही देण्यात आली. त्यामुळे आंदोलन गुंडाळण्यात आले. 

मात्र, पाटबंधारे विभागाने 8 रोजी एक तातडीचे परिपत्रक काढून 10 मे रोजी पाणी सोडता येणार नाही, असे लेखी कळवून आंदोलक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली. याच कारणाने सुमारे दोनशेच्या वर शेतकरी व महिला एकत्र येऊन सर्वांनी मिळून कोरेगाव- धानोरे शाखेचे कालवा गेट खोलले व पाणी सुरू केले. त्यावर शिक्रापूर पोलिस घटनास्थळी आले. त्यानंतर शेतकरी व पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. त्यानुसार कोरेगाव- धानोरे शाखेच्या तीनपैकी एका चारीला पाणी सुरू ठेवण्यात आले. तसेच, करंदी, जातेगाव बुद्रूक, जातेगाव खुर्द, हिवरे, मुखई, बुरुंजवाडी आदी गावांतील बेकायदेशीर 135 विद्युत मोटारी काढून टाकण्यात आल्या. 

दरम्यान, आंदोलक शेतकरी या संपूर्ण कार्यवाहीवर समाधानी असताना पाटबंधारे खात्याकडून शिक्रापूर पोलिसांकडे 10 मे रोजीच समाधान डोके, नितीन दरेकर, अविनाश दरेकर, राजाराम केवटे आदींसह करंदी व जातेगाव खुर्दसह शेजारील गावांमधील 20 महिलांसह एकूण 65 शेतकऱ्यांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले. याबाबत सर्व शेतकऱ्यांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक मयूर वैरागकर यांनी दिले. 

याबाबत ऍड. दिग्विजय पलांडे यांनी सांगितले की, दोन- दोन पत्रे देवून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्भवण्यास जबाबदार झालेल्या पाटबंधारे खात्याच्या वरिष्ठ व कनिष्ठ अधिकाऱ्यांवर 8 रोजी सरकारी कामात कसूर केल्याचे गुन्हे दाखल करावेत, यासाठी शेतकऱ्यांचे शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार अर्ज आहे. याबाबत पोलिसांकडून आता पाटबंधारे खात्याचे अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे. या शिवाय चासकमान कालव्याच्या संपूर्ण पाणी वितरणात कायद्याला फाटा देवून जो कारभार होत आहे व झालाय, याबाबत आणि गुन्हा दाखल झालेल्या शेतकऱ्यांच्या बाजूने न्यायालयात तातडीने दाद मागणार आहे. हे प्रकरण कायद्याच्या कक्षेत पूर्ण शेतकरी हिताचे होईपर्यंत थांबणार नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com