मंचरसाठी अग्निशमन बंबाची मागणी
मंचर, ता. ४ : शहराचा वाढता विस्तार व परिसरात झालेल्या आगीच्या घटना या पार्श्वभूमीवर मंचर नगरपंचायतीसाठी त्वरित अग्निशमन बंब वाहन मंजूर करावे, अशी मागणी उपनगराध्यक्ष संदीप थोरात यांच्या नेतृत्वाखालील नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आंबेगाव तालुक्यातील मंचर शहर व परिसरात घटना घडल्यानंतर येथे अग्निशामक बंब व्यवस्था नाही. राजगुरुनगर किंवा जुन्नर येथून अग्निशामक बंब मागवावा लागतो. त्यामध्ये फार वेळ वाया जातो. परिणामतः आगीमुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे आर्थिक नुकसान होते. ही बाब लक्षात घेऊन तातडीने येथे अग्निशामक बंब वाहन उपलब्ध व्हावे , अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील बाणखेले, नगरसेवक धनेश मोरडे, उर्मिला प्रवीण मोरडे, माणिक गावडे, डॉ. सोनाली विकास बाणखेले, मालती थोरात, वंदना बाणखेले, पल्लवी गांजाळे आदी नगरसेविका उपस्थित होत्या. मंचर शहराची लोकसंख्या व भौगोलिक विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वाढत्या शहरीकरणामुळे आग लागण्याच्या घटनांमध्येही वाढ होत असून अनेक वेळा नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

