खेड तालुक्यात पाच दिवसांत चार बळी

मानवनिर्मित चुका कारणीभूत, पालकांनो काळजी घ्या
Four deaths in five days in Khed taluka
Four deaths in five days in Khed taluka

आंबेठाण - खेड तालुक्यात मागील पाच दिवसांत चार निष्पाप चिमुकल्यांचा जीव गेला आहे. केवळ मानवनिर्मित चुकांमुळे या घटना घडल्या असून जागामालकांचा निष्काळजीपणा आणि पालकांचे दुर्लक्ष अशा घटनांना जबाबदार असल्याचे निदर्शनास येत आहे. १२ जुलैला आंबेठाण येथील लांडगे वस्तीवर घडलेल्या घटनेत तीन लहानग्यांच्या जीव गेला आहे. बिहार राज्यातील दास कुटुंब दरनिर्वाहासाठी मागील १५ वर्षांपासून या गावात राहतात. इतक्या वर्षाच्या सहवासाने हे कुटुंब एकप्रकारे गावचेच होऊन गेले होते.

यातील कुटुंब प्रमुख दास यांना पत्नी आणि चार मुले होती. लोकवस्तीजवळ शेतकऱ्याने खोदलेल्या खड्ड्यात पडून झालेल्या दुर्दैवी घटनेत रोहित दास (वय १०) श्वेता दास (वय ८) राकेश उर्फ रॉकी दास (वय ६) अशा सख्ख्या तीन बहीण भावांचा मृत्यू झाला आहे. तर १७ जुलैला कोरेगाव खुर्द येथील माळवाडी येथे शौचालयासाठी खोदलेल्या खड्ड्यांत पडून गाथा नितीन कडूसकर या अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे.याच कुटुंबाने घराच्या बाजूला शौचालयासाठी खड्डा घेतला होता पण पावसाने त्यात पाणी साचल्याने काम बंद होते. मुलगी खेळता खेळता तिकडे गेली आणि दुर्घटना घडली.

अशा घटना जरी घडून गेल्या असल्या तरी त्या मानवनिर्मित चुकांमुळे झालेल्या आहे याचे भान राखायला हवे. सुविधांकरिता किंवा अन्य कामांसाठी खोदाई केली जाते मान्य आहे. परंतु काम बंद असताना सुरक्षेचा उपाय म्हणून त्या खड्ड्याला कुंपण करायला हवे किंवा त्यावर झाकण टाकायला हवे होते. किंवा गरज संपल्यानंतर असे खड्डे बुजवून टाकायला हवेत. आजही गावोगावीच काय परंतु वस्तीवस्तीत असे अनेक मानवनिर्मित किंवा नैसर्गिक खड्डे आहेत. याची जबाबदारी जागा मालक किंवा स्थानिक प्रशासन यांनी घ्यायला हवी.

काही ठिकाणी पाणी जमिनीत जिरवण्यासाठी नैसर्गिक किंवा मानवनिर्मित खड्डे आहेत पण काही ठिकाणी तर गावकी-भावकीत एकमेकांची जिरवण्यासाठी खड्डे घेतले गेले आहेत. अनेक ठिकाणी जागेच्या वादातून खड्डे घेतले आहेत. वाद जरी असतील तरी त्या ठिकाणी सुरक्षेसाठी उपाय योजना केल्या पाहिजेत.ग्रामीण भागात आजही अनेक ठिकाणी बैलगाडा शर्यतीसाठी घाट केले असून घाटाच्या एका बाजूला खोल भाग केलेला असतो. आजही त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले दिसत आहे.ते पाणी बाहेर काढून देण्याची व्यवस्था केली गेली पाहिजे. विहरींचे कठडे कमी उंचीचे असतील तर त्यांची उंची वाढविली गेली पाहिजे. अशा प्रकारे सुरक्षेचे उपाय योजले आणि प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखुन पाल्यांची काळजी घेतली तर भविष्यात अशा दुर्घटना नक्की रोखता येतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com