
Ganeshotsav: पुण्यातील मंडळांना विसर्जनापुर्वी धक्का; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
पुणे : पुण्यातील गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीवरून पुण्यातील काही गणेश मंडळांनी कोर्टात एक याचिका दाखल केली होती. ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे गणेश मंडळांना मोठा धक्क बसला असून यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
(High Court Dismissed Ganesh Mandal Petition)
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीचा वाद आता कोर्टात गेला असून, विसर्जन मिरवणुकीच्या वेळी आधी मानाचे पाच गणपती जातील त्यानंतर लहान गणपती जाणार ही बंधनं का? असा सवाल गणेश मंडळांकडून करण्यात आला होता. यासंदर्भातील याचिका दाखल करण्यात आली होती. पण ऐन गणेशोत्सवाच्या काळात हा निर्णय देता येणार नाही असं म्हणत ही याचिका फेटाळण्यात आली आहे.
काय आहे वाद?
पुण्यात मानाचे पाच गणपती आहेत. विसर्जनावेळी मानाच्या पाच गणपतींना मिरवणुकीत पहिला मान असतो. तर इतर मंडळांना त्यानंतर मान मिळतो त्यामुळे विसर्जनासाठी लहान गणपती मागे का? मानाच्या गणपतीच्या अगोदर इतर मंडळांना विसर्जन करण्यासाठी परवानगी का नाही? असा सवाल मंडळांकडून करण्यात येत होता. मानाच्या गणपती मंडळांकडून इतर मंडळांना तुच्छतेची वागणूक देण्यात येत असल्याचा आरोप केला जात होता. त्यानंतर हा वाद त्यानंतर उच्च न्यायालयात गेला असून मंडळांकडून शैलेश बढाई यांनी असीम सरोदे यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली होती.