कर्जप्रश्नावरून ‘घोडगंगा’च्या सभेत रणकंदन

कर्जप्रश्नावरून ‘घोडगंगा’च्या सभेत रणकंदन
Published on

आंधळगाव, ता.१९ : न्हावरे (ता. शिरूर) येथील कन्यादान मंगल कार्यालयात रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (ता.१९) घोषणाबाजी आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे गाजली. कारखान्याच्या कर्जप्रश्‍नावरून सत्ताधारी व विरोधी गटाच्या समर्थकांमध्ये घोषणाबाजी झाली. सभेचे कामकाज संपल्यानंतर विरोधी गटाने सभास्थळीच प्रतिसभा घेतल्याने वातावरण अधिकच तापले.
सभेच्या सुरुवातीला कारखान्याचे उपाध्यक्ष पोपट भुजबळ यांनी प्रास्ताविक केले. यावेळी दिवंगत संचालक व सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभेच्या प्रारंभी काही सभासदांनी गोंधळ घातला. संतप्त सभासदांना महेश ढमढेरे व श्रीनिवास घाडगे यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. प्रभारी कार्यकारी संचालक विकास पाटील यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. त्यानंतर काकासाहेब खळदकर, सुधीर फराटे, ॲड. सुरेश पलांडे यांच्यासह सभासदांनी विविध प्रश्‍न उपस्थित केले.
दरम्यान, कारखाना सुरू करण्यासाठी आमचा पाठिंबा असून, राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यायला हवे, असे आवाहन महेश ढमढेरे यांनी केले.

कारखान्याचे अध्यक्ष ऋषिराज पवार म्हणाले,‘राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ तसेच माजी कृषिमंत्री शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी घोडगंगा कारखान्याला कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत शब्द दिला आहे. त्यामुळे आम्ही सकारात्मक आहोत. एनसीडीसीकडे प्रलंबित असलेल्या कर्जाच्या प्रस्तावात भाजपबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित काही कारखानेही आहेत. त्यामुळे लवकरच एनसीडीसीचे कर्ज उपलब्ध होईल.’

‘खासगीकरण किंवा कारखाना भाडेतत्त्वावर देणे हा आजच्या बैठकीचा विषय नव्हता. जोपर्यंत एनसीडीसीकडून पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत कारखाना सुरू होऊ शकणार नाही,’ असेही पवार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कर्ज, कारखाना सुरू करण्याची प्रक्रिया आणि मागील कामकाजावरून सभासदांनी प्रश्‍न उपस्थित केले. त्यावरून दोन्ही बाजूंच्या समर्थकांमध्ये घोषणाबाजी झाली. सभेचे कामकाज संपल्यानंतर विरोधी गटाने सभास्थळीच स्वतंत्र प्रतिसभा घेतली. यावेळी श्रीनिवास घाडगे, दादा पाटील फराटे, आबासाहेब गव्हाणे, बाळासाहेब घाडगे, शशिकांत दसगुडे, काकासाहेब खळदकर आदींनी भूमिका मांडल्या.

दरम्यान, राज्य सरकारने १८४ कोटी रुपयांची थकहमी घेऊनही संचालक मंडळाच्या चुकीच्या कारभारामुळे कर्जप्रस्ताव मंजूर झाला नाही, असा आरोप सुधीर फराटे यांनी केला.

‘शिवराळ भाषा वापरणे योग्य नाही’
सभासदांच्या प्रश्‍नांना उत्तरे देताना कारखान्याच्या अध्यक्षांना शिवराळ भाषा वापरणे योग्य नाही. अध्यक्षांचे भाषण सभासदांना ऐकू देऊ नये, यासाठी एकाच कुटुंबातील लोकांनी गदारोळ केला, असा आरोप माजी आमदार तथा कारखान्याचे संचालक अशोक पवार यांनी केला.

यावेळी राहुल पाचर्णे, दादा पाटील फराटे, संभाजी फराटे, नरेंद्र माने, सचिन मचाले, सुभाष कळसकर, स्वप्नील ढमढेरे, स्वप्नील गायकवाड, विश्‍वास ढमढेरे, राजेंद्र जासूद, राजेंद्र नरवडे, बाळासाहेब नागवडे, राहुल गवारी, यशवंत गव्हाणे, वीरेंद्र शेलार आदी उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com