पर्यावरण संवर्धनासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा

पर्यावरण संवर्धनासाठी
तरुणांनी पुढाकार घ्यावा
Published on

पुणे, ता. १७ : ‘‘भारताच्या लोकसंख्येपैकी ५० टक्के लोकसंख्या ही तरुणांची आहे. येत्या काळात तरुणांनी पर्यावरणाशी निगडित समस्या लक्षात घेऊन सामाजिक दायित्वाच्या भावनेतून पर्यावरण विषयावर काम करावे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी दूत म्हणून काम करावे,’’ असे मत माजी खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी व्यक्त केले.
सेंटर फॉर यूथ डेव्हलपमेंट अँड अ‍ॅक्टिव्हीटीज (सीवायडीए) यांच्यातर्फे जागतिक युवा दिनानिमित्त ‘ग्रीन यूथ मूव्हमेंट’चे उद्‍घाटन करताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी ‘तेरे देस होम्स’च्या डॉ. नम्रता जैटली, नगरसेवक अ‍ॅड. अविनाश साळवे, नगरसेविका सुमय्या नदाफ, ‘सीवायडीए’चे संस्थापक-संचालक मॅथ्यू मट्टम आदी उपस्थित होते.
अ‍ॅड. चव्हाण पुढे म्हणाल्या, ‘‘शहरात पूर्वी उन्हाळ्यातही पंख्याची गरज नव्हती; आता वातानुकूलन यंत्रणेशिवाय बसवत नाही. थोडा पाऊस झाला, तरी पूरस्थिती निर्माण होते. जागतिक तापमानवाढ आणि पर्यावरणाचा दिवसेंदिवस ऱ्हास होत असल्याने ही परिस्थिती उद्‍भवली आहे.’’ मॅथ्यू मट्टम यांनी प्रास्ताविकात पर्यावरणाची चळवळ सुरू करण्यामागची भूमिका स्पष्ट करताना स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन यावर काम करण्यासाठी ही चळवळ उपयुक्त ठरेल, असे नमूद केले. देवेंद्र बनसोडे व आकांक्षा अहिरे यांनी सूत्रसंचालन केले. पौर्णिमा चलवादी यांनी आभार मानले.

Marathi News Esakal
www.esakal.com