
मुळशीत पावसाने जनजीवन विस्कळीत
पिरंगुट - मुळशीत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून रस्ते जलमय झाले आहेत. बहुतांशी रस्त्यांना ओढ्यांचे स्वरूप आले असून अनेक गावांतील राहत्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. काही ठिकाणी संरक्षक भिंती जमीनदोस्त झाल्या असून शेतांचे बांध फुटल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
भुकूम (ता. मुळशी) येथील ओढ्याच्या बाजूला असलेली संरक्षण भिंत पडल्याने त्याचे दगड ओढ्यात अडकल्याने ओढ्याचे पाणी भिंतीलगतच्या घरात घुसले आहे. घरातील लोकांना बाहेर काढले असून सुरक्षिक स्थळी हलविण्यात आलेले आहे. चांदे येथील रामकृष्ण ससार यांच्या घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी तसेच अन्य वस्तूंचे नुकसान झाले आहे. चांदे , घोटावडे , मुलखेड आदी बागातील शेतकऱ्यांचे बांध फुटल्याने शेतीचे नुकसान झालेले आहे.
सध्या भात रोपे लागवडीयोग्य झाली असून काही ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहिल्याने नुकसान झाले आहेत. तर काही ठिकाणी भातरोपांखालील जमीनच वाहून गेली आहे. त्यामुळे भातरोपे मातीसह वाहून गेली आहेत. चांदे येथील कैलास मांडेकर, अरुण मांडेकर, गोरख मांडेकर, सुदाम ससार, मारुती ससार,चंद्रकांत ससार , माणिक मांडेकर, नवनाथ ढोरे,गणेश ससार तसेच अन्य शेतकऱ्यांच्या शेतांचे तसेत भातरोपांचे नुकसान झाले आहे.
पुणे कोलाड रस्त्यावरही भूगाव , भुकूम , लवळे फाटा , पिरंगुट , घोटावडे फाटा , शिंदेवाडी , कासार आंबोली आदी ठिकाणच्या रस्ताावरून पाणी वाहत असल्याने नाल्याचे स्वरुप आलेले होते. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू होती.