समन्वयासाठी वरिष्ठ आयएएस अधिकारी नेमणार

समन्वयासाठी वरिष्ठ आयएएस अधिकारी नेमणार

Published on

समन्वयासाठी वरिष्ठ आयएएस अधिकारी नेमणार मुख्यमंत्र्यांची घोषणा; त्र्यंबकेश्‍वर ज्योतिर्लिंगासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६ : विधानसभेत राज्याचा सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला असून विकासासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये त्र्यंबकेश्‍वराचा समावेश असून या निर्णयामुळे पुजारी, विश्‍वस्त, भाविकांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे. प्रमुख १२ ज्योतिर्लिंगांपैकी पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. या ज्योतिर्लिंगांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये ही मोठी तरतूद करण्यात आली असून पाच ज्योतिर्लिंगांसाठी पाच वरिष्ठ आयएएस अधिकार्यांकडे समन्वय सोपवले आहेत. या ज्योतिर्लिंग देवस्थान विकासासाठी आवश्यक निधी दिला जाणार आहे. महाराष्ट्रात नाशिक येथे त्र्यंबकेश्वर, पुण्यातील खेड येथे भीमाशंकर, छत्रपती संभाजीनगर येथील वेरुळजवळील घृष्णेश्वर, बीडमधील परळी जवळील वैजनाथ मंदिर आणि हिंगोलीतील औंढा नागनाथ ही पाच ज्योतिर्लिंग आहेत. या पाचही ज्योतिर्लिंगांसाठी वरिष्ठ आयएएस अधिकार्यांकडे समन्वय सोपविण्यात आले आहे. या पाच ज्योतिर्लिंगांच्या परिसरात मूलभूत सुविधा, तीर्थक्षेत्र सुशोभीकरण, भाविकांसाठी निवास व्यवस्था, वाहतूक सुविधा आणि स्वच्छता व्यवस्थेवर विशेष भर दिला जाणार आहे. राज्य सरकारने या कामांच्या नियोजन व अंमलबजावणीसाठी वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांकडे समन्वय दिल्याने निर्णयप्रक्रियेत अचूकता आणि वेग येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. प्रशासकीय अनुभवामुळे निधीचा योग्य वापर, विविध विभागांमधील समन्वय आणि प्रकल्पांची वेळेत पूर्तता याला चालना मिळणार आहे. या निर्णयामुळे तीर्थक्षेत्रांचा सर्वांगीण विकास होऊन धार्मिक पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे. देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी सोयीसुविधा वाढल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेलाही हातभार लागणार आहे. भाविकांमध्येही या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले जात असून तीर्थक्षेत्रांचा नियोजनबद्ध विकास झाल्यास दर्शनव्यवस्था सुलभ होणार आहे. त्यामुळे गर्दीचे व्यवस्थापन सुधारणार असून धार्मिक वातावरण अधिक सुस्थितीत राखता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. धार्मिक स्थळांचा विकास आणि प्रशासनाची थेट जबाबदारी यामुळे राज्यातील तीर्थसंस्कृती अधिक बळकट होण्यास मदत होईल, असा विश्वासही धार्मिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे. जिल्हाधिकारी शर्मा यांनी केली होती मागणी त्र्यंबकेश्‍वर देवस्थान ट्रस्ट सोबत समन्वय साधण्यासाठी सनदी अधिकार्याची नियुक्ती करावी, अशी मागणी तत्कालीन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी राज्य शासनाकडे केली होती. आयएएस दर्जाचा अधिकारी देवस्थानावर नियुक्त केल्यास व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने होऊ शकेल अशी या निर्णयामागील धारणा होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी केवळ त्र्यंबकेश्‍वरच नव्हे तर राज्यातील पाच ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी आयएएस दर्जाचे अधिकारी नियुक्त करून या मागणीला पुष्टी दिली आहे. त्र्यंबकेश्‍वर देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकार्यांची नियुक्ती विविध पद्धतीने होते. यात आयएएस दर्जाचे समन्वयक राहिल्यास कुंभेमळ्याच्या नियोजनावर त्याचा सकारात्मक परिणाम होईल यातून देवस्थानची प्रतिमा अधिक उंचावेल या दृष्टीने काम व्हायला हवे. देवस्थान ट्रस्टच्या बाबतीत अधिक शिस्तबद्ध नियमावली तयार करून त्याची अमलबजावणी झाली तर येणार्या कुंभमेळ्यात त्र्यंबकेश्‍वराचे नावलौकिकात भर पडेल. - महंत शंकरानंद सरस्वती, कोषाध्यक्ष, अखिल भारतीय आखाडा परिषद आयएएस अधिकारी नियुक्तीच्या संदर्भात शासनादेश प्राप्त झाल्यानंतर त्यावर सविस्तर प्रतिक्रिया देणे उचित ठरेल. समन्वयकाची जबाबदारी काय असणार यावर पुढील प्रतिक्रिया अवलंबून राहील. - मनोज थेटे, विश्‍वस्त, त्र्यंबकेश्‍वर देवस्थान ट्रस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com