वाहनांचा वेग पादचाऱ्यांच्या जिवावर! पाच वर्षांत साडेचारशे ठार

वर्षाच्या पहिल्या तिमाहीत २० जणांचा मृत्यू
High Speed Of Vehicle
High Speed Of VehicleTeam Esakal

पुणे : दहा दिवसांपूर्वी मुंबई-बंगळुरू महामार्गावर जांभुळवाडीतून पुण्याकडे येणाऱ्या रस्त्यावर कविता फडतरे (वय ३६) रस्ता ओलांडत होत्या. तेवढ्यात भरधाव कंटेनरने त्यांना उडविले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही केवळ एकच घटना नाही, तर भरधाव वाहनांमुळे नववर्षाच्या पहिल्या तिमाहीतच १५ ते २० पादचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. मागील पाच वर्षांत सुमारे साडेचारशे पादचाऱ्यांचा अपघातामध्ये मृत्यू झाला आहे.

लोणीकंद, लोणी काळभोर, कात्रजसह शहराच्या वेगवेगळ्या भागांत मागील काही दिवसांत भरधाव वाहनांनी जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात तीन ते चार पादचाऱ्यांचा जीव गेल्याची घटना घडली. स्वतःची काहीही चूक नसतानाही केवळ वाहनचालकांच्या बेशिस्त व बेदरकारपणामुळे होणाऱ्या अपघातांमध्ये पादचाऱ्यांना आपला जीव गमावण्याची वेळ येत आहे. विशेषतः शहराभोवती असलेल्या महामार्गांवर अशा घटना सातत्याने घडत आहे.

शहराभोवतीच्या परिसरातून जाणाऱ्या महामार्गांवर असणारा सुविधांचा अभाव, शहरामधील रस्ते व पदपथांमध्ये असणारी कमालीची असमानता, वाहने व विक्रेत्यांची अतिक्रमणे अशा अन्य कारणांमुळेही पादचारी अपघातामध्ये सापडत आहेत. त्याचा सर्वाधिक फटका वृद्ध नागरिक, महिला व तरुणांना बसत आहे. शाळा-महाविद्यालये सुरू असताना विद्यार्थ्यांनाही अशा अपघातांचा सामना करावा लागतो.

अपघातांची प्रमुख कारणे

  • अनेक रस्त्यांवर पदपथ, पथदिव्यांचा अभाव

  • अनेक ठिकाणी पदपथ व रस्ते समान पातळीवर

  • विविध भागांतील वर्दळीच्या रस्त्यांवर गतीरोधकच नाहीत

  • सिग्नल यंत्रणा, रस्त्यांवर पट्टे नसने

  • रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पार्क केलेली वाहने

  • भरधाव व विरुद्ध दिशेने येणारी वाहने

  • रस्त्याने चालताना नागरिकांकडून होणारे दुर्लक्ष

Graph of Last 5 Year Pedestrians Death due to high Speed
Graph of Last 5 Year Pedestrians Death due to high SpeedTeam Esakal

''मागील वर्षी माझा मित्र बाजारपेठेतून खरेदी करून पायी रस्त्याने जात होता. त्यावेळी एका वाहनाने त्यास पाठीमागून धडक दिली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. विक्रेत्यांची अतिक्रमणे, रहदारीच्या रस्त्यांवर वाहने उभी करणे व गर्दीच्या तुलनेत पादचाऱ्यांना जाण्यासाठी असलेली जागा कमी असणे, अशा वेगवेगळ्या कारणांमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालण्याशिवाय पर्याय राहात नाही.''

-वैभव कदम

''भरधाव वाहनांमुळे होणारे अपघात लक्षात घेऊन अशा वाहनचालकांवर दररोज कारवाई केली जात आहे. पादचाऱ्यांनीही रस्ता, चौक ओलांडताना नागरिकांचे होणारे दुर्लक्षही मृत्यूचे कारण ठरू शकते. त्यामुळे पादचाऱ्यांनीही आवश्‍यक काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर पदपथ, सिग्नल, गतिरोधक अशी तांत्रिक कामे महापालिकेशी संवाद साधून वेळोवेळी केली जात आहेत.''

-राहुल श्रीरामे, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com