इतिहासाचा धडा घेत भारतीय लष्कराने सज्ज रहावे; संरक्षण तज्ञांचे मत

लडाख आणि अरुणाचल प्रदेशात अस्थिरता निर्माण करण्याचे काम चीन करत आहे. पाकिस्तानला मदत करण्याच्या अनुषंगाने लडाखमध्ये हल्ले केले जात आहे.
Indian army soldier
Indian army soldierSakal

पुणे - लडाख आणि अरुणाचल प्रदेशात अस्थिरता निर्माण करण्याचे काम चीन करत आहे. पाकिस्तानला मदत करण्याच्या अनुषंगाने लडाखमध्ये हल्ले केले जात आहे. उत्तरेकडील बर्फवृष्टीमुळे चीनी सैन्य माघार घेईल असा भ्रम भारताने ठेवू नये. कारण चीनने १९६२ मध्ये याच कालावधित हल्ला केला होता. त्यामुळे इतिहासाचा धडा घेत लष्कराने चीन व पाकिस्तानचे संबंध, सैन्यांमधील युद्ध सराव आणि हालचालीवर लक्ष ठेवण्याची गरज संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

सध्या चीन तैवानबाबत आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. तसेच भारताच्या पूर्व आणि पश्‍चिमी सीमांवर देखील तणाव वाढत आहे. या अनुषंगाने भारतीय लष्कराच्या सज्जतेसंदर्भात ‘सकाळ’ने संरक्षण तज्ञांशी संवाद साधला. लेफ्टनंट जनरल (निवृत्त) दत्तात्रेय शेकटकर म्हणाले, ‘‘युद्धात उंच शिखरावरील सैन्याला नेहमी फायदा होतो. त्यामुळे भारतीय सैन्यदलाने शिखरांवर वर्चस्व स्थापित केल्यास चीनला हरविणे अधिक सोपे होल. त्याचबरोबर भारतीय हवाईदलाच्या क्षमतेचा वापर करण्याची आवश्‍यकता आहे. कोरोनाशी लढताना चीनने २०१९ मध्ये गलवान येथे घुसखोरी केली होती. चीनवर येत्या काळात विश्‍वास ठेवणे चुकीचे आहे. पूर्व लडाखमध्ये आता त्या अनुषंगाने सज्ज राहण्याची गरज आहे.’’

चीन सध्या नियंत्रण रेषेच्या (एलओसी) भागात विशेषतः अरुणाचल प्रदेश सीमेवर लष्करी हालचाली वाढवत आहे. भौगोलिक महत्त्व आणि सामरिक कारणांमुळे चीनचे तवांग ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचबरोबर चीन सिलिगुडी कॉरिडोरवर लक्ष केंद्रित करत आहे. २०१७ मध्ये याच कारणामुळे डोकलामचा प्रश्‍न निर्माण झाला होता. हा भाग भारतासाठी महत्त्वाचा असून यावर चीनने नियंत्रण मिळविल्यास भारतीय सैन्याला येथून हलविण्यास चीनला फायदा होईल. आगामी काही महिन्यात भारताला पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) हालचालींवर लक्ष ठेवण्याची गरज आहे, असे मत मेजर जनरल (निवृत्त) राजन कोचर यांनी व्यक्त केली.

पीएलएची क्षेपणास्त्र रणनीती -

पीएलएद्वारे प्रामुख्याने क्षेपणास्त्र हल्ल्यांवर भर दिला जातो. भारतीय लष्कराला क्षेपणास्त्र बेस शोधून काढणे आणि अशा प्रकारच्या बेसवर हल्ले करण्याची गरज आहे. युद्ध सारखी परिस्थिती निर्माण झाल्यास त्वरित भारतीय हवाईदलाचे विमान या भागात पोचतील अशा प्रकारची व्यवस्था हवाईदलाने करण्याची गरज आहे. या पूर्वी भारतीय लष्कराने १९६२ मध्ये हवाईदलाचा वापर न करून मोठी चूक केली होती.

याची आवश्‍यकता अधिक -

- शस्त्रास्त्रांचा मोठा साठा

- इंटिलीजेन्स, सर्व्हिलेन्स, तंत्रज्ञानाचा वापर

- प्रतिकूल परिस्थितीमध्ये सैन्याला लागणारे संसाधने

- बॅटल ग्रुप्सला तैनात करणे

- राजनैतिक प्रयत्नांवर भर देणे

- सीमावर्ती भागात सज्जता वाढवायला हवी

‘‘चीनद्वारे माहिती, लेझर, ड्रोन अशा विविध प्रकारचे युद्ध केला जाऊ शकतो. त्यासाठी भारताला आधुनिक शस्त्रास्त्र, वाहने, ड्रोन, कम्युनिकेशन सिस्टिम अशा संसाधनांची गरज आहे. एकीकडे चीन तैवानसाठी आक्रमक भूमिका दाखवत असला तरी भारताचे तैवानसोबत चांगले संबंध आहेत. इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी लागणारे ‘चीप’चा पुरवठा हा तैवान भारताला करतो. त्यामुळे तैवानला भारताने थेट मदत केल्यास चीन भारतावर हल्ला करण्यास अधिक आक्रमक होईल.’’

- कमोडोर (निवृत्त) एस एल देशमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com