पुणे : येत्या एक एप्रिलपासून देशभरातल्या रेशनिंग दुकानात अंडी, मटण, चिकन यांसह मासे हे मांसाहारी पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे.
मात्र, रेशनिंग दुकानातून मांसाहारी पदार्थांची विक्री करणे हे सामाजिक आणि आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सारासार विचार करून असा निर्णय घेऊ नये, अशी मागणी सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. कल्याण गंगवाल यांनी शुक्रवारी (ता.२८) पत्रकार परिषदेत केली.
डॉ. गंगवाल म्हणाले, "नीती आयोगाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सादर केलेल्या आपल्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये देशातील नागरिकांना मांसाहार पदार्थ स्वस्त दरात मिळावेत, तसेच त्यांना पौष्टीक आहार सहज उपलब्ध व्हावा, यासाठी रेशन दुकानांमध्ये ही व्यवस्था करण्याचा विचार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, मांसाहार पदार्थ म्हणजेच पौष्टिक आहार असे मानणे चुकीचे आहे. शास्त्रीय दृष्टिकोनातूनही मानवी शरीरासाठी शाकाहारच योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे.
देशभरातील सुमारे साडेपाच लाख रेशन दुकानांमधून गरीब नागरिकांसाठी स्वस्त दरात मांसाहार पुरवण्याचा निर्णय घेतल्यास अनेक प्रश्न उभे राहतील. यासाठी १ लाख ८४ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. यातील ५२ हजारांहून अधिक दुकाने महाराष्ट्रात आहेत.
मांसाहारामुळे मॅड काऊ डिसीज, इबोला, स्वाईन फ्लू, सार्ससारखे रोग मानवी शरीरात येण्याची शक्यता अधिक असते. चीनमध्ये आलेल्या कोरोना विषाणूचा उगमसुद्धा मांसाहारातूनच झाला आहे. तसेच हृदयरोग आणि कर्करोगावर मात करण्यासाठी जगातील सर्व तज्ज्ञ डॉक्टर मांसाहार वर्ज्य करण्याचा सल्ला देत आहेत.
या पार्श्वभूमीवर अशाप्रकारे मांसाहाराचा प्रचार करणे चुकीचे आहे. या सर्व बाबींवर विचार न करता सरकारने नीती आयोगाची शिफारस स्वीकारल्यास महावीर जयंतीदिवशी (ता.6 एप्रिल) सर्व शाकाहारी नागरिक जनांदोलन करतील, असा इशाराही डॉ. गंगवाल यांनी यावेळी दिला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.