देशात नोकऱ्या नाहीत, असे मानणे चूक - राज्यपाल कोश्‍यारी

पुणे विद्यापीठ - सावित्रीबाई फुले पुणे विद्यीपाठाच्या पदवीप्रदान समारंभात ‘दी प्रेसिडेंट ऑफ इंडिया शंकर दयाळ शर्मा सुवर्णपदक’ काजल महाजन या विद्यार्थीनीला भगत सिंह कोश्‍यारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी (डावीकडून) डॉ. गगनदीप कंग, महाजन, कोश्‍य
पुणे विद्यापीठ - सावित्रीबाई फुले पुणे विद्यीपाठाच्या पदवीप्रदान समारंभात ‘दी प्रेसिडेंट ऑफ इंडिया शंकर दयाळ शर्मा सुवर्णपदक’ काजल महाजन या विद्यार्थीनीला भगत सिंह कोश्‍यारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी (डावीकडून) डॉ. गगनदीप कंग, महाजन, कोश्‍य

पुणे - ‘देशात नोकऱ्या नाहीत, असे मानणे चूक आहे. आपण जगातून अनेक गोष्टींची आयात करत आहोत. याचाच अर्थ आपण देशातील श्रमशक्ती, बुद्धीचा व्यवस्थित उपयोग करू शकलो नाही. विद्यार्थ्यांनीही त्यांच्या क्षमतेचा पूर्ण वापर करून देशासाठी मोठे योगदान द्यावे,’’ असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात राज्यपाल कोश्‍यारी बोलत होते. हरियानामधील फरिदाबाद येथील ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी संचालक डॉ. प्रा. गगनदीप कंग, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, उपकुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. अरविंद शाळिग्राम यांच्यासह विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य या वेळी उपस्थित होते. 

कोश्‍यारी म्हणाले, ‘‘शिक्षण घ्यायचे म्हणून आपण पदवी प्राप्त करतो; पण भविष्यात पुढे काय करायचे आहे, याचे उत्तर विद्यार्थ्यांकडे नसते. केवळ नोकरी करण्यात गुंतून न जाता क्षमतांचा पूर्ण वापर केला पाहिजे. तुम्हाला समाजकारण, राजकारण, साहित्य यासह कोणत्या क्षेत्रात जायचे आहे निश्‍चित करा, कोणतेही ध्येय गाठताना आयुष्यात समस्या, आव्हाने सर्वांपुढे आहेत. सर्वोच्च अशा अमेरिकेपुढेही इराणचे आव्हान आहेच. त्यामुळे खचून न जाता प्रयत्न करत राहिले पाहिजे.’’   

डॉ. गगनदीप कंग म्हणाल्या, ‘‘पदवी प्राप्त करून तुम्ही यश मिळवले आहे; पण त्यामुळे नवी नाती, नवे ज्ञान, नवी उत्पादने, नवे दृष्टिकोन हे चमत्कार झाल्याप्रमाणे प्राप्त होणार नाहीत. त्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे लागणार आहेत. धैर्य आणि धोका पत्करणाऱ्या व्यक्तींसाठी लोक जे. के. रोलिंग, स्टीव्ह जॉब्ज यांची उदाहरणे देतात; पण आपण क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या पलीकडे पाहण्याची गरजही नाही. कारण त्यांनी समाजात परिवर्तन घडवून आणले.’

एक लाखापेक्षा जास्त जणांना पदवी 
पदवीप्रदान समारंभाच्या निमित्ताने विद्यापीठात व संलग्न महाविद्यालयांमध्ये पदवी ते पीएचडीपर्यंतच्या एकूण १ लाख ९ हजार ९३० जणांना पदव्यांचे वितरण करण्यात येत आहे. त्यात ११६ सुवर्णपदके आणि ३८९ पीएचडींचा समावेश आहे. 

प्रमुख सुवर्णपदक विजेत्यांची नावे 
काजल पंडित महाजन (रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी, पुणे), सुप्रिया सोमनाथ गोडसे, हर्षदा खंडू बारवकर. वक्तृत्व स्पर्धा ः प्रथम क्रमांक- स्नेहल अमृतकर (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ). दुसरा क्रमांक- (विभागून)- सारांश सोनार (कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाविद्यालय, जळगाव) आणि पूजा काटकर (पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com