Baramati News : जनाईच्या हक्काच्या पाण्यासाठी मंगळवारी मुंबईत बैठक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुपे येथे चर्चा, तोडगा न निघाल्यास उपोषणावर शेतकरी ठाम
janai water scheme meeting on tuesday at mumbai ajit pawar politics
janai water scheme meeting on tuesday at mumbai ajit pawar politicsSakal

सुपे : जनाई उपसा जल सिंचन योजनेच्या हक्काच्या पाण्यासाठी मंगळवारी (ता.३०) मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले आहे.

या बैठकीसाठी लाभधारक दहा शेतकरी, योजनेचे संबंधित वरिष्ठ अधिकारी व मी अशा एकत्रित बैठकीत चर्चा करून योग्यतो निर्णय घेऊ अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुपे (ता.बारामती) येथील आमरण उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांशी बोलताना दिली.

तर बैठकीत योग्य तोडगा न निघाल्यास आम्ही उपोषणावर ठाम असल्याची भूमिका शेतकऱ्यांनी मांडली. शुक्रवारी (ता.२६) रात्री उपमुख्यमंत्री पवार यांनी अचानक दौऱ्यात बदल करून उपोषणस्थळी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

पवार म्हणाले - योजनेबाबत ज्यांना चांगली माहिती आहे असे दहा शेतकरी या. अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करू. तुमचे समाधान झाले तर ठिक. नाही झाले तर तुम्ही निर्णय घ्या. तुम्हाला उपोषण थांबवा हे सांगायला आलो नाही.

माझ्या हातातील गोष्टी मी लागलीच मार्गी लावल्या आहेत. धरणे किती टक्के भरली आहेत त्यावर पाण्याचे वाटप केले जाते, असा नियम आहे. याविषयी अधिकाऱ्यांसह सविस्तर चर्चा करू. काही तांत्रिक प्रश्न अधिकाऱ्यां बरोबर चर्चा करून सुटतात.

उपोषण कर्त्यांच्या १२ मागण्यांवर पवार यांनी चर्चा केली. त्यातील बहूअंशी मागण्या मार्गी लावत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या शनिवारी सुप्यात झालेल्या दुष्काळी पाणी टंचाई बैठकीतही उकल केलेल्या प्रश्नांची माहिती उपोषण कर्त्या शेतकऱ्यांना दिली. पवार म्हणाले - बारामतीला निघालो होतो. तुम्हाला न कळवता आलो. कारण आधी कळवले असते तर गर्दीमुळे आपल्याला चर्चा करता आली नसती.

उन्हाळी आवर्तनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक फेब्रुवारी मध्ये घेणार आहे. आवर्तनाविषयी नियोजन करावे लागणार आहे. कालवा सल्लागार समितीत सदस्यपदासाठी तुम्ही तीन शेतकऱ्यांची निवड करून त्यांना प्रतिनिधी म्हणून बैठकीसाठी पाठवा.

योजनेचे वीजपंप, कालवा दुरूस्तीसाठी निधी मंजूर केला असून, पुरंदरसाठी ६० कोटी मंजूर केले आहेत. तर जनाईसाठी सुमारे ४० कोटींची गरज लागणार आहे. बजेटच्या वेळी त्याविषयी निर्णय घेणार आहे. मुख्य कालव्या ऐवजी बंद पाईपातून पाणी देण्याचे सरकारचे धोरण आहे.

त्यामुळे पाणी वाया जात नाही, टेलच्या शेतकऱ्यांना पोचते. शिवाय जमिनीच्याखाली तीन फूट पाईप असल्याने शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे वाचते. सर्वांची संमती असेल तर माझी तयारी आहे.

यावेळी शेतकरी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष पोपटराव खैरे, भानुदास बोरकर, सचिन साळुंके, ज्ञानेश्वर कौले, दिलीप खैरे, दत्तात्रेय बोरकर, राजेंद बोरकर, विजय खैरे, फक्कड भोंडवे, दादा पाटील, महेश गायकवाड, महादेव भोंडवे, संजय दरेकर आदींसह शेतकऱ्यांनी योजनेविषयी विविध प्रश्न मांडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com