जावळीत गटशिक्षणाधिकार्यांविरोधात रिपाई आक्रमक
जावळीत गटशिक्षणाधिकाऱ्यांविरोधात रिपाइं आक्रमक
हुमगाव, ता. १ : जावळी तालुक्यातील दुर्गम बामणोली विभागात जिल्हा शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी कारभारात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (गवई गट) जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांनी दिला आहे.
याबाबत गाडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, जावळीतील दुर्गम अशा बामणोली विभागात अनेक शाळांत शिक्षकच अनुपस्थित असतात, तर अधिकारी इकडे फिरकतच नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होतच आहे; पण या शिक्षकांची मुजोरी अधिकच वाढली आहे. या विभागात सुगममधून दुर्गममध्ये बदली झालेल्या महिला शिक्षिकावर शिक्षण विभाग मेहेरबान झाला असून, या शिक्षकांना चारच महिन्यांत दुर्गममधून सुगममध्ये प्रतिनियुक्ती देऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान चालवले आहे. सुगममधून दुर्गममध्ये बदली झालेल्या शिक्षण उपसंचालक कुलाळ यांची पत्नी तसेच मांटीमुरा येथील एका शिक्षिकेला प्रतापसिंह हायस्कूल सातारा व कोडोलीतील एका शाळेत प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. केवळ अधिकाऱ्याची पत्नी म्हणून शिक्षण विभाग त्यांच्यावर मेहेरबान झाल्याचे स्पष्ट दिसत असून, या सोयीने केलेल्या प्रतिनियुक्त्या तत्काळ रद्द कराव्यात, तसेच या भागात नव्याने बदली झालेला एक शिक्षक हा शिक्षक बँकेचा संचालक असून, तो शाळेत कधीही हजर नसतो, तसेच संबंधित शिक्षकाने या शाळेत खासगी शिक्षक नेमल्याचे बोलले जात आहे. यापूर्वीदेखील जावळीच्या गटशिक्षणाधिकांऱ्यांच्या बाबतीत अनेक गंभीर तक्रारी असूनदेखील संबंधित अधिकाऱ्याला पाठीशी घातले जात आहे. त्यामुळे तालुक्यात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षकांचे मनोधैर्य खचत आहे. त्यामुळे या दोन्ही नियुक्त्या तत्काळ रद्द कराव्यात, तसेच संबंधित शिक्षकाला आपल्या कर्तव्याची जाणीव शिक्षण विभागाने करून द्यावी. याबाबत योग्य तो निर्णय शिक्षण विभागाकडून न घेतल्यास येत्या पाच मार्चला रिपाइं शिक्षणाधिकाऱ्याच्या दालनाबाहेर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे गाडे यांनी सांगितले आहे.

