जेजुरी - "चंपाषष्ठी दिवशी अवतार धरिसी, मणिमल्ल दैत्यांचा संहार करिसी', याप्रमाणे मार्तंड भैरवाचा अवतार दिवस म्हणून महत्त्व असलेल्या चंपाषष्ठी षडरात्र उत्सवाची उद्या (ता. 24) जेजुरीच्या खंडोबा गडावर सांगता होणार आहे. यानिमित्ताने गडावर वांगे भरीत आणि भाजी भाकरीच्या महाप्रसादाचे दिवसभर वाटप होणार आहे.
मार्तंड भैरवाने मार्गशिर्ष शुद्ध प्रतिपदेला अवतार धारण केला. त्यानंतर सहा दिवस, षष्ठीपर्यंत मणिमल्लाबरोबर युद्ध चालले. मणिमल्ल दैत्याचा संहार केला. म्हणून हा दिवस विजयोत्सव म्हणून साजरा करतात. लढाईत विजय मिळाल्यानंतर या दिवशी चाफ्याच्या फुलांची वृष्टी झाली. चाफा म्हणजे चंपा, म्हणून चंपाषष्ठी अशीही अख्यायिका सांगितली जाते. अनेक भाविक भक्तांनी वर्ज्य केलेले वांगे आणि कांदा खाण्यास या दिवसापासून सुरवात करतात. सहा दिवसांचे षडरात्रीचे उपवासही पंचाषष्ठीला घट उठल्यानंतर सोडतात.
कुलधर्म- कुलाचारासाठी हे दिवस महत्त्वाचे मानले जातात. खंडोबाचे दर्शन घेणे, दिवटी पेटविणे, तळी भरणे, घरचे देव उजळवणे आणि नवीन टाक खरेदी करणे यासाठी मार्गशिर्ष महिना आणि चंपाषष्ठीचा दिवस महत्त्वाचा मानला जातो. यानिमित्त महाराष्ट्रातून भाविक खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरीत येतात. मार्तंड देवसंस्थान व पुजारी सेवक वर्ग यांच्या वतीने गडावर चंपाषष्ठीची मोठी तयारी केली आहे. उद्या पहाटे साडेपाच वाजता पूजा होईल. त्यानंतर नऊ वाजता घट उठतील. मग भाविकांचे उपवास सुटतील.
भरीत रोडग्याचा आणि भाजी भाकरीचा नैवेद्य खंडोबाला दाखविला जाईल. त्यानंतर वांगे भरीत आणि भाजी भाकरीच्या महाप्रसादाचे वाटप होईल. सुमारे पन्नास हजार भाविकांना मोफत अन्नदानाचे गडावर पुजारी सेवक वर्गाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. गडाच्या परिसरात दिवटी पेटविणे आणि तळी भरण्याचे कार्यक्रम सुरू आहे.
चंपाषष्ठीनिमित्ताने भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन त्यांना लवकर दर्शन मिळावे, यासाठी गडावर देवसंस्थानने नियोजन केले आहे. गडावर पिण्याच्या पाण्याची अतिरिक्त सोय केली आहे. गडावर आणि गावात दिवसभर जागरण-गोंधळ, तळी भरणे असे धार्मिक विधी चालणार आहेत. त्यासाठी नियोजन केले आहे.
|