पुणे : डेटा हे रोजगारक्षम इंधन : प्रा. विजयराघवन

पुणे : डेटा हे रोजगारक्षम इंधन : प्रा. विजयराघवन

पुणे : माहितीच्या (डेटा) आधारावर कृत्रिम बुद्धिमत्ता रोजगाराच्या संधी हिरावून घेईल, अशी जगभर चर्चा आहे. परंतु हीच माहिती रोजगारक्षम इंधन ठरेल, असे मत देशाचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रा. के. विजयराघवन यांनी व्यक्त केले. रविवारी आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्राच्या (आयुका) स्थापनादिन व्याख्यानात ते बोलत होते.

आयुकाच्या चंद्रशेखर सभागृहात माहितीचे संस्करण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा परिपेक्ष मांडणारे "मंथन' त्यांनी उपस्थितांसमोर मांडले. यावेळी "आयुका'चे संस्थापक प्रा. जयंत नारळीकर, प्रा. मंगला नारळीकर, संचालक प्रा. सोमंक रायचौधरी, "एनसीआरए'चे संचालक प्रा. यशवंत गुप्ता आदी उपस्थित होते.

प्रा. विजयराघवन म्हणाले, "जीवसृष्टीच्या निर्मितीपासून माहितीचे संकलन आणि विश्‍लेषण करण्यात येते. उत्क्रांती होत असताना माहिती संकलनाच्या वेगात हळूहळू वाढ होत गेली. आज 21व्या शतकात माहितीचे स्वरूप आणि उपलब्धता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे माहिती (डेटा) हे आधुनिक जगातील इंधन आहे.''

विविध स्त्रोतांकडून मिळालेल्या आकडेवारीतील माहितीतून आवश्‍यक सूचना बाहेर काढणे, त्या सूचनांचे ज्ञानात रूपांतर करणे आणि हे मिळालेले ज्ञान उपयोजित पद्धतीने सामान्य लोकांना उपलब्ध करणे, या संपूर्ण प्रक्रियेसाठी बौद्धिक कौशल्याची गरज आहे. शिक्षित युवा वर्ग आणि माहितीचे आगार असलेल्या भारताला हे कौशल्य प्राप्त करणे कठीण नाही, असे विजयराघवन म्हणाले. 

'माहितीचा नैतिक आधारावर उपयोग व्हावा' 

खासगी आयुष्यातील माहिती सार्वजनिक होण्याच्या प्रश्‍नाबाबत प्रा. राघवन म्हणाले, "काळाच्या प्रत्येक कालखंडात व्यक्तीच्या रोजच्या जीवनाबद्दल संस्था अथवा संबंधित समुदायाला कल्पना होती. वैयक्तिक आयुष्यातील माहिती फार कमी वेळा खासगीत राहते. आधुनिक साधनांमुळे निश्‍चितच त्यात वाढ झाली आहे. नैतिक आधारावरच माहितीचे योग्य उपयोग होणे गरजेचे आहे.'' 

'बिग डेटा'चे फायदे

- अचूक माहितीमुळे कर्करोग निदान, वैद्यकीय विश्‍लेषण अधिक जलद 
- कनेक्‍टेड व्हेईकल, स्वयंचलित वाहणे यामुळे वाहतूक अधिक सुरक्षित 
- पाणी, माती आणि बाजारातील डेटाच्या आधारे कृषिक्षेत्रात क्रांती होईल 
- संरक्षण क्षेत्रात आधुनिकता 
- जागतिक तापमान वाढ, हवामान बदल आदी पर्यावरणीय समस्यांसाठी उपाय उपलब्ध होतील. 

देशात असामान्य बुद्धिमत्तेचे असंख्य विद्यार्थी विखुरलेल्या अवस्थेत आहेत. जागतिक स्तरावर डेटाच्या आधारावर "इम्पॅक्‍ट' साधण्यासाठी, या विद्यार्थ्यांमध्ये माहिती आणि कौशल्याचे एकाच व्यासपीठावर आदानप्रदान होणे गरजेचे आहे. 

- प्रा. के. विजयराघवन, देशाचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com