

सकाळ संवाद
- - - - - - - - - - -
कर्वे रस्त्यावरील उड्डाण पुलाची
बंद लिफ्ट सुरू करावी
कोथरूड- कर्वे रस्त्यावरील मृत्युंजय मंदिर चौकातील उड्डाण पुलाची लिफ्ट अनेक वर्षांपासून बंदच आहे. ज्येष्ठ नागरिकांना पन्नास पायऱ्या चढून जाणे शक्य नसल्याने त्यासाठी मोठा खर्च करून लिफ्ट उभारल्या आहेत, परंतु थोडे दिवस सुरू राहिल्यानंतर देखभाल दुरुस्तीअभावी बंद पडलेल्या लिफ्ट सुरू केल्या नाहीत, तसेच या पुलाखाली भिक्षेकरी आणि मद्यपींचा अड्डा असतो. दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. भिक्षेकरी या जागेचा उपयोग प्रातर्विधीसाठी करतात. त्यामुळेच पदपथावर दुर्गंधी पसरते. महापालिकेने हे सर्व अनिष्ट प्रकार थांबवून लिफ्ट सुरू करून येथे देखरेख ठेवणे आवश्यक आहे.
- शिवाजी पठारे, कोथरूड
- - - - - - - - - --
लोकमान्यनगरमधील तुटलेल्या
चेंबरची दुरुस्ती करावी
नवी पेठेतील लोकमान्यनगर जॅागिंग पार्कमधील दत्त मंदिरासमोरील रस्त्यावरील ड्रेनेजचे झाकण तुटले आहे. पादचाऱ्यांसह वाहनचालकांना हे निदर्शनास न आल्यास अपघात संभवू शकतो. एखादा अनर्थ घडण्याअगोदर महापालिका प्रशासनाने तातडीने या झाकणाची दुरुस्ती करावी.
-एन. विलास, पुणे
-----------------------------
सनसिटी पुलाकडे जाणाऱ्या
रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करावी
वारज्यातील वांजळे पुलाखालून सनसिटी पुलाकडे जाताना रस्त्यावर मोठे खोल खड्डे पडल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. रस्त्यावर खडी पसरली आहे. डांबरीकरण करून रस्त्याची दुरुस्ती करावी, तसेच पुलाच्या कडेला कचरा साठत चालला आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी येत आहे. महापालिका प्रशासनाने योग्य त्या उपायांची अंमलबजावणी करावी.
-हेमंत भालेराव, पुणे
-----------------------------
रस्त्यालगत कचरा टाकणाऱ्यांवर
कडक कारवाई करावी
सनसिटी रोडवरील सन प्लॅटिनम शेजारील रस्त्यालगत भाजी विक्रेत्यांसह काही नागरिकांकडून कचरा टाकला जातो.
कचरा कुजून परिसरात दुर्गंधी पसरते. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो.
शिवाय भटकी कुत्री येथे रस्त्यावर घाण ओढत आणून टाकतात, त्यांची पण संख्या वाढली आहे. सकाळी मॉर्निंग वॉक करताना अंगावर धावून येतात. महापालिका प्रशासनाने योग्य त्या उपायांची अंमलबजावणी करीत असताना या भटक्या कुत्र्यांचासुद्धा बंदोबस्त करायला हवा.
- अर्चना रानडे, सन सिटी रोड
---------------------
दिवसाआड पाणी पुरवठ्याऐवजी
महापालिकेने वेळेत कपात करावी
पाणी कपात तूर्तास ३१ मेपर्यंत होणार नसल्याचे महापौरांनी जाहीर केल्याचे वर्तमानपत्रातून वाचण्यात आले. ही निश्चितच दिलासादायक बाब आहे. मात्र, भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण झाल्यास दिवसाआड पाणीपुरवठा करण्यापेक्षा दररोजच्या पाणीपुरवठ्याच्या वेळेत १ ते २ तास कपात करणे अधिक योग्य ठरेल. कारण दिवसाआड पाणीपुरवठा झाल्यास अनेक नागरिक मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा करून ठेवतात. त्यामुळे पुढील दिवशी पाणी आल्यानंतर आधी साठवलेले पाणी न वापरता अनेकदा ते ओतून दिले जाते. यात मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होते. त्याऐवजी दररोज २ ते ३ तास पाणीपुरवठा केल्यास नागरिकांना आवश्यक तेवढेच पाणी साठवावे लागेल व पाण्याचाही अपव्यय टाळता येईल. त्यामुळे प्रशासनाने या पर्यायाचा गांभीर्याने विचार करावा, ही असंख्य पुणेकर नागरिकांच्या वतीने विनंती.
-विलास कुलंगे, कसबा पेठ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.