खडकवासला : नियोजित काँक्रिटऐवजी केला डांबरी रस्ता; स्थानिकांमध्ये संताप

khadkwasla road
khadkwasla road

किरकटवाडी : अगोदरच तब्बल दोन वर्षांपेक्षा जास्त काळ विलंब झालेल्या खडकवासला गावातून जाणाऱ्या मुख्य सिंहगड रस्त्याचे नियोजित कॉंक्रिटीकरण न करता अचानक रात्रीच्या वेळी डांबरीकरण करण्यात आल्याने नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. अंदाजपत्रकाप्रमाणे काम न झाल्यास काम बंद पाडले जाईल, असा इशाराही सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

'हायब्रीड ॲन्युईटी' या पद्धतीने सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा ते वेल्हे तालुक्यातील पाबे दरम्यान रस्त्याचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. या कामासाठी 202 कोटींचा निधी मंजूर आहे. नांदेड फाटा ते डोणजे फाटा या दरम्यान अंदाज पत्रकामध्ये सिमेंट काँक्रीटचा रस्ता प्रस्तावित आहे तर तेथून पुढे पाबेपर्यंत डांबरी रस्ता प्रस्तावित आहे.

खडकवासला गावातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली होती. मोठमोठे खड्डे पडल्याने ग्रामस्थांसह परिसरातील नागरिक हैराण झाले होते. याबाबत गावातील पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन अनेक वेळा निवेदन देऊन रस्त्याचे काम वेगाने पूर्ण करण्याची मागणी केली होती. तसेच जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत किमान खड्डे तरी बुजवावेत अशी मागणी नागरिक करत होते. अचानक रात्रीच्या वेळी खडकवासला गावातील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करण्यात आल्याने पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनीही संताप व्यक्त केला आहे. 

सर्वपक्षीय नेत्यांचा आक्षेप

"चुकीच्या पद्धतीने रस्त्याचे काम सुरू असून डांबरी रस्ता टिकणार नाही. जशी मंजुरी मिळाली आहे त्याप्रमाणेच काम व्हावं," असं मत काँग्रेस नेते राहुल मते यांनी व्यक्त केलंय. तर "अंदाजपत्रकात काँक्रीटच्या रस्त्याला मंजुरी असताना अधिकाऱ्यांनी परस्पर डांबरीकरण करण्याचा निर्णय कसा काय घेतला? अगोदरच कासवगतीने काम सुरू आहे त्यातच असा निकृष्ट रस्ता मिळणार असेल तर तो किती दिवस टिकणार?" असा सवाल मनसे नेते विजय मते यांनी केला. त्याचबरोबर "एवढे दिवस वाट पाहिली,आता चांगला व टिकणारा रस्ता मिळावा ही आमची मागणी आहे," असं खडकवासलाचे सरपंच सौरभ मते म्हणाले. 

सार्वजनिक बांधकाम विभागानं दिलं स्पष्टीकरण

दरम्यान, "खडकवासला गावातील रस्ता सिमेंट कॉंक्रिटचा केल्यास मोठ्या प्रमाणात रस्त्याची उंची वाढेल व त्यामुळे पावसाळ्यात आजुबाजुच्या घरांमध्ये पाणी शिरेल. त्यामुळे भविष्यात उद्भवणारी अडचण लक्षात घेऊन गावातील सुमारे चारशे मीटरचा टप्पा डांबरीकरण करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेण्यात आला आहे. याबाबत गावातील पदाधिकारी व नागरिकांशी चर्चा करून सविस्तर माहिती देण्यात येणार आहे," असं स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता ज्ञानेश्वर राठोड यांनी दिलं. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com