पाल यात्रा लेख

पाल यात्रा लेख

Published on

भाविकांचे श्रद्धास्थान ः पालचा खंडोबा


महाराष्ट्र- कर्नाटकसह आंध्र प्रदेश या राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पाल (ता. कऱ्हाड) येथील खंडोबा यात्रेचा मुख्य दिवस आज (शुक्रवारी) होत आहे. यंदा होणाऱ्या यात्रेसाठी प्रशासन व देवस्थान समितीने यात्रेची तयारी पूर्ण झाली असून, यात्रेसाठी पालनगरी सज्ज झाली आहे.

- संतोष चव्हाण

यावर्षी होत असलेल्या यात्रेत भाविकांना सर्वतोपरी सेवा देण्याचा मानस प्रशासनासह यात्रा समितीने केला आहे. खंडोबा- म्हाळसा मंदिर विद्युतरोषणाईने सजविण्यात आले आहे. उत्तरेकडील वाळवंटात यात्रेसाठी दुकाने, सिनेमागृहे, पाळणे यासह तंबू उभारले आहेत. त्याचबरोबर यात्रेतील भाविकांवर लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी वाॅच टॅावर उभारण्यात आले आहेत. मिरवणुकीसाठी मार्ग मोकळा करण्यात आला आहे.
यासह काशीळ- पाल या रस्त्यालगत मेवामिठाई, खेळणी व छोटी-छोटी हॅाटेल व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. एसटी प्रशासनाने काशीळ- पाल मार्गावर आदर्शनगरजवळ तात्पुरत्या बसस्थानकाची तयारी केली आहे. आरोग्य विभाग, स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन, देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमिटी व सर्व शासकीय विभागाने आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आहेत.
महाराष्ट्रातील मोठ्या यात्रात पालच्या श्री खंडोबाची यात्रेचा समावेश होतो. यामध्ये सासनकाठ्या, पालखी असतात. मानाचे चोपदार, मानकरी यांचा घोडा, तसेच या मिरवणुकीत देवस्थानचा ढोल्या, गडशी, भालदार, ठाकर, आरशेवाले, फुलांच्या सहा छत्र्या, सासनकाठी, तसेच रखवालदार सामील होतात. सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी गोरज मुहूर्तावर विधिवत श्री खंडोबा-म्हाळसा यांचा लग्नसोहळा होतो.
यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता पुन्हा सर्व मानकरी व त्यांच्या सहकाऱ्यांना बहुल्यावर मानाचे श्रीफळ- प्रसाद पुजाऱ्या हस्ते देण्यात येते. त्यानंतर मुख्य मानकरी श्री. खंडोबा- म्हाळसा यांच्या मूर्ती पोटाशी घेऊन पालखीत विराजमान करत पालखी वाजत गाजत मंदिराकडे जाण्यासाठी रवाना होते. यावेळी गावातील ग्रामस्थ व भाविक दर्शनाचा लाभ घेतात. पालखी मंदिरात गेल्यानंतर मुख्य व इतर मानकरी हे खंडोबा व म्हाळसा यांच्या मूर्ती सिंहासनावर विराजमान करतात. त्यानंतर पुजारी देवाला स्नान घालून पोशाख परिधान करून देवास काहीकाळ विश्रांती दिली जाते. यावेळी काहीकाळ दर्शन बंद ठेवण्यात येते. त्यानंतर धुपारती करून सर्व बाहेरगावचे कारखाना व मानकऱ्यांना मानाचे श्रीफळ व मानकऱ्यांना भोजन व्यवस्था केली जाते. सर्व कारखाना व मानकरी हे पाकाळणीपर्यंत दररोज धुपारतीस हजर राहतात.
यात्रेच्या पाचव्या दिवशी देवाची पाकाळणी असून, या दिवशी पाकाळणीला संपूर्ण गावातील ग्रामस्थ हे देवाला व ग्रामदैवतास स्नान घालतात. हा विधी सकाळी सहा वाजल्यापासून सुरू होतो. १० वाजेपर्यंत तो उरकला जातो. त्यानंतर देवाचे मुख्य मानकरी व देवस्थान ट्रस्ट हे देवास स्नान घालतात. यानंतर देवाचे पुजारी मंडळी देवास पोशाख करून धुपारती केली जाते. पाकाळणीदिवशी प्रत्येक घरातील भाविक हा दिवटी बुदली व पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन देव दर्शनास येतात. या दिवशी संध्याकाळी मुख्य मानकऱ्यांच्या घरातील महिला या देवाची हळद काढतात. त्यानंतर देवाची दीपमाळ प्रज्वलित केली जाते. यावेळी सर्व कारखाना, मानकरी व भाविक मोठ्या उत्साहाने या सोहळ्यात सहभागी होऊन श्री खंडोबा व म्हाळसा यांचा विवाह सोहळा पार पाडल्याचा आनंद दिसून येतो.
-------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com