खरीप आढावा बैठकीवर एल निनो, युद्धाचे सावट

खरीप आढावा बैठकीवर एल निनो, युद्धाचे सावट
Published on

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली
आज सह्याद्री अतिथिगृहावर बैठक

ॲग्रोवन वृत्तसेवा
मुंबई : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे आज (ता.२१) राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक आयोजित केली आहे. या बैठकीवर ‘एल निनो’ तसेच मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे खतांचा तुटवडा आणि निर्यातीवर झालेल्या परिणामांचे सावट आहे. सध्या कृषी विभागासमोर खतांच्या पुरवठ्याचे मोठे आव्हान आहे.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेत व पुरेशा प्रमाणात बियाणे, खते, सिंचन सुविधा, पीककर्ज, पीकविमा तसेच तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याबाबत या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती, उत्पादन खर्चातील वाढ आणि बाजारपेठेतील आव्हाने लक्षात घेता खरीप हंगामाची पूर्वतयारी अधिक सक्षम व समन्वयात्मक पद्धतीने करण्याबाबत सादरीकरण केले जाणार आहे.
आज दुपारी एक वाजता होणाऱ्या या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषी राज्यमंत्री आशिष जसस्वाल, पणनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह विविध विभागांचे मंत्री, राज्यातील सर्व पालकमंत्री, कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच सहकार, पणन, हवामान, ऊर्जा, पशुसंवर्धन, जलसंधारण व बँकिंग क्षेत्रातील संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत. मुंबई क्षेत्रातील संबंधित अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहणार असून इतर अधिकारी व जिल्हास्तरीय यंत्रणा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी होणार आहेत.
बैठकीमध्ये खरीप हंगाम २०२६ करिता बियाणे, खते, पीककर्ज, सिंचन, हवामान अंदाज, पीकविमा, शेतकरी कल्याणकारी योजना, कृषी निविष्ठा उपलब्धता, विविध कृषी योजनांची अंमलबजावणी तसेच विविध कृषी विस्तार कार्यक्रमांचा आढावा घेण्यात येणार आहे.
राज्यात खरीप हंगाम २०२६ मध्ये प्रमुख अन्नधान्य पिकांचे सुमारे १४५.१४ लाख हेक्टर क्षेत्र अपेक्षित असून, त्यासाठी आवश्यक २०.१६ लाख क्विंटल बियाण्यांच्या तुलनेत सुमारे २८.१४ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहेत. महाबीज, राष्ट्रीय बीज निगम तसेच खासगी उत्पादकांमार्फत बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले असून, खतटंचाई टाळण्यासाठी राज्य शासनामार्फत उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
खरीप २०२५ मध्ये राज्यासाठी मंजूर ४६.८२ लाख टन खतांच्या तुलनेत ३९.२७ लाख टन खतांचा पुरवठा करण्यात आला. या बैठकीत संभाव्य ‘एल निनो’मुळे पावसाचे प्रमाण कसे राहील, याबाबत हवामान विभागाकडून सादरीकरण करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com