अतिक्रमणांनी रस्ते, पदपथही गिळले; नागरिक त्रस्त

अतिक्रमणांनी रस्ते, पदपथही गिळले; नागरिक त्रस्त

Published on

विजय गायकवाड : सकाळ वृत्तसेवा
पिंपळे गुरव, ता.३० : कृष्णा चौक, नवी सांगवी परिसरात दिवसेंदिवस अतिक्रमणे वाढत आहेत. नागरिकांना रस्ता आणि पदपथांवरून चालणेही कठीण झाले आहे. भाजीपाला विक्रेते, पथारीवाले तसेच हातगाड्यांवर व्यवसाय करणारे विक्रेते यांनी रस्त्याच्या कडेला नव्हे, तर थेट रस्त्याच्या मध्यभागापर्यंत अतिक्रमण केले आहे. यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण होत आहेत.
कृष्णा चौक हा परिसर आधीच वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत वर्दळीचा मानला जातो. त्यातच अतिक्रमणांमुळे रस्त्याची रुंदी कमी होत असून वाहतूक कोंडीचे प्रकार सातत्याने घडत आहेत. अनेक वेळा रुग्णवाहिका, अग्निशमन दल किंवा अत्यावश्यक सेवा वाहने अडकून पडत असल्याच्या घटनाही नागरिकांकडून सांगण्यात येत आहेत. सायंकाळी पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत या परिसरात अतिक्रमणांचे प्रमाण प्रचंड वाढते. कामावरून घरी परतणारे नागरिक, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना या गर्दीचा त्रास सहन करावा लागत आहे. पदपथांवर व रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावे लागत आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चौकापासून अवघ्या ३०० मीटर अंतरावर साई चौक येथे अधिकृत भाजी मंडई उपलब्ध असतानाही फेरीवाले चौकातच व्यवसाय थाटतात. यामुळे सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे.
‘‘महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून या अतिक्रमणांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. वेळोवेळी तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का,’’ अशी प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.

नागरिकांची अपेक्षा
- अतिक्रमणे तातडीने हटवून वाहतूक सुरळीत करणे
- पदपथ मोकळे करणे तसेच फेरीवाल्यांना नियोजित भाजी मंडईत स्थलांतरित करणे
- चौकातील स्थितीबाबत प्रशासनाने तातडीने नियोजन करावे
- सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत रस्ता मोकळा असावा
- पथारीवाले व हातगाडी व्यावसायिकांना मंडईत स्थलांतरित करावे

अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे बोट
‘‘कृष्णा चौक, नवी सांगवी परिसरांतील वाढत्या अतिक्रमणांकडे महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. वारंवार तक्रारी, निवेदने व प्रत्यक्ष समस्या मांडूनही ठोस कारवाई होत नसल्याने फेरीवाले व पथारीवाल्यांचे मनोबल वाढले आहे. एखाद-दुसरी कारवाई झाल्याचे दाखवून परिस्थिती पूर्ववत होणे ही नित्याची बाब बनली असून त्यामुळे रस्ते व पदपथ पुन्हा अतिक्रमणांच्या विळख्यात सापडत आहेत. प्रशासन अपघात घडल्यावरच जागे होणार का, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.

नवी सांगवी परिसरातील कृष्णा चौक येथील अतिक्रमणे होणाऱ्या ठिकाणाची माहिती घेऊन क्षेत्रीय अतिक्रमण निर्मूलन अधिकाऱ्यांना अतिक्रमण हटवण्याच्या तत्काळ सूचना देण्यात येतील.
- अतुल पाटील, सहाय्यक आयुक्त, अतिक्रमण निर्मूलन विभाग

साई चौकात अधिकृत भाजी मंडई आहे. अनधिकृत भाजी विक्रेत्यांमुळे अधिकृत विक्रेत्यांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच हे व्यावसायिक रस्ते अडवत असल्याने त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. महानगरपालिकेने तत्काळ अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करावी.
- संजय मराठे, अध्यक्ष, लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट, साई चौक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com