

भूमिहीनांना मिळणार तेरा एकर जमीन
सबलीकरण योजनेतून चोराखळीत जमिनीची खरेदी
ॲग्रोवन वृत्तसेवा
धाराशिव : सामाजिक न्याय विभागाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेतून जिल्ह्यातील तीन भूमिहीन कुटुंबांना तेरा एकर जमिनीचे वाटप करण्यात येणार आहे. योजनेतून विभागाने चोराखळी (ता. कळंब) शिवारात जमीन खरेदी केली असून, तीन लाभार्थींना तिचे लवकरच वाटप करण्यात येणार आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना उत्पन्नाचे शाश्वत साधन उपलब्ध व्हावे, त्यांच्या राहणीमानात सुधारणा व्हावी तसेच मजुरीवरील अवलंबित्व कमी होऊन त्यांना कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत निर्माण व्हावा, या उद्देशाने सन २००४ पासून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना राबविण्यात येते.
चोराखळी येथील ज्योती संतोष खुणे यांना १ हेक्टर ७१ आर जिरायती जमीन वाटप करण्यात येणार आहे. रमाबाई राजकुमार वंजारे यांनाही याच गटातील १ हेक्टर ७१ आर क्षेत्र देण्यात येणार आहे. याशिवाय विलास अच्युत खंडागळे व लक्ष्मी विलास खंडागळे यांना १ हेक्टर ८० आर जिरायती जमीन वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी दिली.
-- चौकट ---
यंदा जमीन उपलब्ध
या योजनेतून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन कुटुंबांना चार एकर कोरडवाहू (जिरायती) किंवा दोन एकर ओलीताखालील (बागायती) जमीन शंभर टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिली जाते. मागील काही वर्षातील अनुभव लक्षात घेता योजनेत जमीन उपलब्ध होत नव्हती. मात्र, गेल्यावर्षी विभागाने योजनेतून चोराखळी येथील गट क्रमांक ५३९ मधील जिरायती क्षेत्र ५.३८ हेक्टर म्हणजेच १३ एकर १८ आर जमीन खरेदी केली. या जमिनीचे वाटप तीन लाभार्थ्यांना लवकरच करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.