नारायणगाव (पुणे) : जुन्नर तालुक्लयातील बिबट प्रवण भागात पिंजरा लावला जात आहे, मात्र बिबट्या पिंजऱ्याकडे फिरकतच नाही. त्यामुळे पिंजऱ्याची जागा सतत बदलावी लागत आहे. मागील सहा महिन्यांपासून या भागात बिबट्या पिंजऱ्यात अडकत नसल्याने बिबट्या आता हुशार झाला की काय? अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
नारायणगाव परिसरातील मीना नदी काठावर वसलेल्या मांजरवाडी, गुंजाळवाडी, वारूळवाडी, आर्वी, हिवरे तर्फे नारायणगाव, देवजाळी या भागात बिबट्यांचे पाळीव जनावरांवर हल्ले वाढले आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात गुंजाळवाडी येथे कुत्रे व पाळीव जनावरे ठार झाली आहेत. पूर्वी बिबटे शेळी व वासरे अशा लहान जनावरांवर हल्ले करत होते. आता मोठ्या जनावरांवरही हल्ला करत आहेत.
वीस जून रोजी वारूळवाडी येथील चंद्रकांत काळे या आदिवासी शेतकऱ्याच्या गोठ्यावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तीन शेळ्या व एक बोकड ठार झाला होता. 29 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास गुंजाळवाडी येथील मिलिंद तोडकर यांच्या गाईवर बिबट्याने हल्ला केला होता. दोन दिवसांनंतर जखमी गायीचा मृत्यू झाला. येथील डॉ. प्रणेश ढवळे यांचा पाळीव कुत्रा बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाला. 15 ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास मांजरवाडी येथील कोंडीभाऊ टेमगिरे यांनी घरासमोर बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला. त्यात चार शेळ्या व एक बोकड ठार झाला. 15 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास देवजाळी येथील मेंढपाळ आनंदा सीताराम करगळ यांच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला चढविला. त्यात दोन शेळ्या व एक बोकड ठार झाला.
बिबट्याची दहशत व पाळीव प्राण्यांचे होणाऱ्या नुकसानामुळे शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त होत आहे. जुन्नर वनविभागाने पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार गुंजाळवाडी, आर्वी, औटेमळा, कोल्हेमळा येथे पिंजरा लावण्यात आला होता. मात्र, बिबट्या सतत जागा बदलत असल्याने पिंजऱ्यात अडकत नाही. पिंजऱ्याची जागा सतत बदलावी लागत आहे. पिंजरा उपलब्ध झाल्यानंतर देवजाळी येथे पिंजरा लावण्यात येईल. पाळीव मृत जनावरांचे पंचनामे केले असून, मृत जनावरांना बाजारभाव किमतीच्या 75 टक्के नुकसान भरपाई वनविभागाच्या वतीने दिली जाते. मृत शेळीला जास्तीत जास्त दहा हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली जाते, असे वनपाल मनीषा काळे यांनी सांगितले.
नुकसान भरपाईत वाढ करण्याची मागणी
मागील वर्षभरात नारायणगाव परिसरातील अनेक वाड्यावस्त्यांवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेतकऱ्यांची जातिवंत पाळीव जनावरे ठार झाली आहेत. त्यामुळे शेळी व मेंढीपालन व्यवसाय अडचणीत आला आहे. बिबट्याचे हल्ले थांबवण्यासाठी वनविभागाने ठोस उपाययोजना करावी. मृत जनावरांच्या नुकसान भरपाईत वाढ करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.