मंदीच्या पार्श्‍वभूमीवर कामगारांना आता दीर्घ रजा?

मंदीच्या पार्श्‍वभूमीवर कामगारांना आता दीर्घ रजा?

पिंपरी - मंदीच्या पार्श्‍वभूमीवर लघू आणि मध्यम उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना दोन किंवा तीन टप्प्यांमध्ये १५ दिवसांची रजा घ्यावी लागण्याची शक्‍यता आहे. मंदीची तीव्रता वाढल्यामुळे अनेक उद्योगांनी सुट्या भागांचे उत्पादन कमी केले आहे. त्यामुळे कामगारांना देण्यासाठी आठ तासांचे काम उपलब्ध नाही. परिणामी, दीर्घ रजेचा निर्णय होऊ शकतो.

मंदीला सुरवात झाल्यानंतर लघू आणि मध्यम उद्योजकांनी खर्चकपात करून रोजगार टिकविण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्यामध्ये कामगारांना देण्यात येणारा ओव्हरटाइम कमी करणे, अत्यावश्‍यक खर्च कमी करणे, अशा उपायांचा समावेश आहे. गणेशोत्सवात मंदीचे ढग कमी होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही. आताच्या परिस्थितीत बाजारपेठेतील वातावरण चांगले नाही. त्यामुळे उद्योजक अडचणीतच आहेत. उत्पादनावरील खर्च कमी करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने देण्यात येणारी कामे तूर्तास थांबवली आहेत. 

याचबरोबर अन्य कोणत्या मार्गाने खर्च कमी करता येतील का, याची चाचपणी सुरू केली आहे. लघू आणि मध्यम उद्योगांकडे असणारे काम कमी झाल्यामुळे त्यांनीदेखील विविध पावले उचलण्यास सुरवात केल्याचे समजते. 

रोजगाराच्या संधी वाढणार
केंद्र सरकारने कंपन्यांकडून घेण्यात येणाऱ्या कॉर्पोरेट टॅक्‍समध्ये पाच टक्‍के कपात करण्याचा निर्णय घेतल्याने आगामी काळात नवीन गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होण्यास मदत मिळणार असल्याचे पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी सांगितले. 

नव्या कर कपातीमुळे कंपनीची वर्षाला १.४५ लाख कोटी रुपयांची बचत होणार आहे. त्यामुळे कंपन्या ही रक्‍कम गुंतवणूक आणि उत्पादनावर खर्च करतील. त्यातून रोजगार वाढण्यास मदत होणार आहे. एक ऑक्‍टोबरपासून अस्तित्वात येणाऱ्या उत्पादक कंपन्यांना कराचा दर १५ टक्‍के राहणार असून त्यांना सेस आणि अन्य सरचार्जसह १७.१ टक्‍के कर भरावा लागणार आहे. कंपन्यांना दिलेल्या कर सवलतीमुळे मेक इन इंडिया योजनेला मोठी चालना मिळणार असून, त्यामुळे नोकर कपात टळणार असून उद्योग वाढीला चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

कंपनी कर कमी झाल्याचा फायदा
केंद्र सरकारकडे कररूपाने जाणारी ही रक्‍कम आता त्यांना व्यवसायवृद्धीसाठी वापरता येणार आहे. त्यामुळे येत्या काळात उद्योगांना चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा शहरातील काही लघुउद्योजकांनी व्यक्‍त केली. दिवाळीला अजून महिनाभराचा अवधी बाकी आहे. या कालावधीत बाजारपेठेत तेजी आल्यास दिवाळी आनंदी होईल, असा विश्‍वास त्यांनी या वेळी व्यक्‍त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com