माळेगाव - 'माळेगाव`ने शेतकऱ्यांना राज्यात प्रथम क्रमांकाचा गतवर्षी ३६३६ अंतिम ऊस दर दिला. चालू हंगामातही माळेगावने प्रतिटन ३१३२ रुपये सर्वाधिक अॅडव्हास जाहीर केला. जून ते जुलैमध्ये खोडकी पेमेंट प्रतिटन २०० रुपये देण्याचे नियोजन आहे.
परिणामी पवारसाहेब अध्यक्ष असलेल्या व्हीएसआय संस्थेने माळेगाव प्रशासनाला उत्कृष्ट अर्थिक नियोजनाचा राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार दिला व सन्मानित केले, अशा माळेगाव कारखान्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युगेंद्र पवार यांच्या कार्यकर्त्यांनी ऊस दरासाठी जागरण गोंधळ आंदोलन केले हे कितपत योग्य आहे, असा सवाल अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप यांनी केला.
माळेगाव (ता.बारामती) सहकारी साखर कारखाना प्रशासनाविरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युगेंद्र पवार यांच्या कार्यकर्त्यांनी ऊस दरासह विविध मुद्दे पुढे करीत मंगळवार (ता. ११ मार्च ) रोजी जागरण गोंधळ आंदोलन केले होते.
कमी ऊस दर, नीरा नदीमधील प्रदुषण आदी मुद्यांच्या आधारे आंदोलनकर्त्यांनी कारखान्याचे सत्ताधारी संचालक मंडळ व भाजप विचाराऱ्यांच्या विरोधकांना धारेवर धरले होते. त्या पार्श्वभूमिवर माळेगावचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जगताप यांनी युगेंद्र पवार यांचा शरयू कारखान्याने गेली १० वर्षात माळेगावच्या तुलनेत शेतकऱ्यांना किती कमी पैसे दिले, याचा लेखा जोखाच मांडला.
जगताप म्हणाले, 'सातारा, सांगली, कोल्हापूर आदी भागात रिकव्हरी (साखर उतारा) झोन आहे. तेथे १३ टक्के पेक्षा अधिक रिकव्हरी मिळते. त्या तुलनेत १ टक्क्यांपेक्षा कमी रिकव्हरी असताना माळेगावने गतवर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात प्रथम क्रमांकाचा ३६३६ दर दिला.
अर्थात एफआरपीपेक्षा अधिकचा दर देण्याची माळेगावची अनेक वर्षांची परंपरा आहे. चालू गळीत हंगामातही ३१३२ रुपये प्रतिटन सर्वाधिक अॅडव्हास जाहीर केला. गुरूवार (ता.२० मार्च) च्या आत उर्वरित ३३२ रुपये प्रतिटन शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग झालेले असतील.
तसेच आगामी शैक्षणिक वर्ष सुरू होताना पुन्हा खोडकी पमेंटच्या माध्यमातून माळेगावच्या शेतकऱ्यांना प्रतिटन दोनशे रुपये देण्याचा विचार आहे, अशी प्राप्त स्थिती असताना युगेंद्र पवार यांच्या कार्यकर्त्यांनी माळेगावर गोंधळ घालून आंदोलन केले. वास्तविक युगेंद्र पवार यांनी स्वतःच्या कारखान्याच्या ऊस दराबाबत आत्मपरिक्षण करावे.
त्यामुळे जागरण गोंधळ आंदोलन कोठे होणे गरजेचे आहे, हे सभासद जाणून आहेत.' नदीच्या प्रदुषणाचा प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहे. फलटण व बारामती तालुक्यातील अनेक कारखान्यांचे दूषित पाणी नदीत येते ही वस्तूस्थिती आहे. माळेगावने प्रदुषण मुक्तीसाठी ईटीपी प्रकल्प उभारला आहे. त्यात आणखी अनुधिक टेक्नाॅलाजी उभारण्याचे काम सुरू आहे, असे जगताप यांनी सांगितले.
माळेगावर शेतकर्यांचा विश्वास...
जिल्ह्यात बहुमतांशी साखर कारखान्यांचे गाळप उसाअभावी बंद झाले आहेत. माळेगाव, सोमेश्वरचे गाळप अद्याप पुर्णक्षमतेने सुरू आहेत. माळेगावने प्रतिदिनी ९ हजार में.टन गाळप करून आजवर १० लाख ६० हजार टन गाळप उरकले. अद्याप गेटकेनधारक शेतकऱ्यांचा ऊस माळेगावला मोठ्या प्रमाणात येत आहे. कारभार चुकीचा असता तर शेतकऱ्यांनी माळेगावला ऊस दिला असता का, याचाही विचार आंदोलनकांनी करावा, असे आवाहन अध्यक्ष जगताप यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.