पुण्यात वाढतोय थंडीचा कडाका;किमान तापमानाचा पारा 4.9 अंश सेल्सिअसने घसरला 

पुण्यात वाढतोय थंडीचा कडाका;किमान तापमानाचा पारा 4.9 अंश सेल्सिअसने घसरला 
Updated on

पुणे - पुण्यात गारठा वाढू लागला आहे. गेल्या सहा दिवसांपासून शहरातील किमान तापमानाचा पारा 4.9 अंश सेल्सिअसने घसरला आहे. पुढील चोवीस तासांमध्ये शहरात थंडी वाढेल. पण, त्यानंतर पुन्हा किमान तापमान वाढण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली. 

पुणे शहर आणि परिसरात या आठवड्याच्या सुरवातीला ढगाळ वातावरण होते. पावसाच्या हलक्‍या सरींनीही हजेरी लावली. अरबी समुद्रावरील कमी दाबाच्या पट्ट्याच्या तीव्रतेबरोबरच ढगाळ वातावरणही कमी झाले. पुण्यात गेल्या चार दिवसांपासून कोरडे वातावरण आहे. त्यामुळे हवेतील गारठा वाढत आहे. शहरातील शिवाजीनगर वेधशाळेत रविवारी (ता. 13) किमान तापमान 18.7 अंश सेल्सिअस नोंदले होते. सरासरीपेक्षा 7.5 अंश सेल्सिअसने तापमान वाढले. पण, त्यानंतर सातत्याने हवेतील गारठा वाढला. शुक्रवारी सकाळी साडेआठपर्यंत शिवाजीनगर येथील किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा 2.9 अंश सेल्सिअसने वाढून, 13.8 अंश सेल्सिअस नोंदला. या सहा दिवसांमध्ये 4.9 अंश सेल्सिअसने किमान तापमान कमी झाले, असे निरीक्षण हवामान खात्याने नोंदवले. 

पुण्यात येत्या रविवारनंतर (ता. 20) किमान तापमानाचा पारा पुन्हा वाढेल. येत्या गुरुवारपर्यंत (ता. 24) तो 16 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदला जाण्याची शक्‍यताही खात्याने वर्तविली. 

यामुळे वाढतेय थंडी 
उत्तर भारतात काही ठिकाणी थंडीची लाट पसरली आहे. त्याचवेळी महाराष्ट्रात हवामान कोरडे आहे. त्यामुळे उत्तर भारतातून थंड आणि कोरडे वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत. त्याचा थेट परिणाम होऊन, राज्यातील बहुतांश भागात थंडी वाढली आहे. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान गोंदिया येथे 13 अंश सेल्सिअस नोंदले गेले. राज्याच्या बहुतांश भागात येत्या काही दिवसांमध्ये थंडीचा कडाका वाढणार असल्याने किमान तापमानात चांगलीच घट होईल, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी राज्यातील काही भागांत झालेल्या पावसामुळे हवेत अजूनही आर्द्रता आहे. यामुळे मध्यरात्रीनंतर चांगलाच गारठा वाढत आहे. यामुळे पहाटे चांगलेच धुके पडत आहे. सध्या राज्यात कोरडे हवामान असल्याने थंडी वाढत असल्याने किमान तापमानात घट होऊ लागली आहे. 

सध्या उत्तर पाकिस्तान व परिसरात बाष्पयुक्त चक्रीय वारे वाहत आहेत. उत्तरेकडील पंजाब, हरियाना, चंडीगड, उत्तर प्रदेश, राजस्थान या भागांत थंडीची लाट आली आहे. यामुळे सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. राजस्थानच्या पश्‍चिमेस चुरू येथे उणे 0.3 अंश सेल्सिअसचे देशातील किमान तापमान नोंदविले गेले. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होणार असून, उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह पुन्हा वाहू लागले आहेत. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत गारठा वाढला आहे. किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत 3 ते 5 अंश सेल्सिअसपर्यंत घट होऊ लागली आहे. 

राज्यात अशी भरली हुडहुडी 
(सर्व आकडे अंश सेल्सिअसमध्ये, कंसात सरासरीपेक्षा वाढलेले किमान तापमान) 
मुंबई (सांताक्रूझ) 22 (1.3), रत्नागिरी 21 (1.1), डहाणू 19.4 (1.2), जळगाव 15.6 (3.7), कोल्हापूर 18.6 (3.8), महाबळेश्‍वर 14.4 (0.8), मालेगाव 15.6 (4.2), नाशिक 15.1 (4.7), सांगली 17 (3.7), सातारा 15.3 (2.6), सोलापूर 17.9 (2.7), औरंगाबाद 15.9 (4.9), परभणी 15 (1.5), नांदेड 18 (6), अकोला 15.6 (2.1), अमरावती 16.7 (1.4), बुलडाणा 15.8 (1.1), चंद्रपूर 18.2 (5.5), गोंदिया 13 (0.7), नागपूर 16.3 (4.1), वर्धा 16 (2.5).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com