
लोकसभा निवडणूकीच्या माध्यमातून ज्यांच्याशी गेल्या तीन निवडणूकांत संघर्ष करून दैदीप्यमान विजय ज्या पक्षाला मिळवून दिला.
शिरूर - लोकसभा निवडणूकीच्या माध्यमातून ज्यांच्याशी गेल्या तीन निवडणूकांत संघर्ष करून दैदीप्यमान विजय ज्या पक्षाला मिळवून दिला, त्याच पक्षाच्या वरिष्ठांनी राष्ट्रवादीसोबत जुळवून घेण्याच्या सूचना केल्याने राजकीय पर्यायच खुंटला म्हणून शिवसेनेपासून दूर जावे लागले, असे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज 'सकाळ' शी बोलताना स्पष्ट केले.
सुरवातीला खेड लोकसभा मतदार संघाचे दोनदा व शिरूर लोकसभा मतदार संघाच्या स्थापनेनंतर सुरवातीलाच असे सलग तीन वेळा शिवसेनेचे लोकसभेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळालेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. हा पराभव जिव्हारी लागलेल्या आढळराव यांनी राष्ट्रवादी विरोधात कसेबसे पुन्हा पाय रोवत संघर्ष पेटता ठेवला असतानाच राज्यातील तत्कालीन सत्तासंघर्षाच्या घडामोडीत शिवसेनेने चक्क राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसशी आघाडी करत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. तिनही पक्षांच्या किमान समान कार्यक्रमांतर्गत अनेक ठिकाणी शिवसैनिकांची गोची झाल्याचा आरोप झाला. शिरूर लोकसभा मतदार संघही याला अपवाद राहिला नाही.
दरम्यान, राज्यात नूकत्याच घडलेल्या धक्कादायक घडामोडींनंतर बहुसंख्य आमदारांबरोबरच; शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करण्याचा सपाटा सुरू केल्यानंतर या फूटीर पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीचा एककलमी कार्यक्रम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुरू केला. शिवाजीराव आढळराव हे शिवसेनेतच असताना आणि बदलत्या घडामोडीत त्यांनी कुठलीही भूमिका बदलली नसतानाही त्यांच्या उपनेतेपदावरून हकालपट्टीचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्यानंतर ती कारवाई मागे घेत खुद्द ठाकरे यांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि या नाट्यमय घडामोडींवर पडदा पडला असे वाटत असतानाच आज शिवाजीराव आढळराव पाटील यांनी थेट दिल्ली गाठत मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी हातमिळवणी केली. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून जाहिर केलेल्या राष्ट्रीय कार्यकारीणीत आढळराव पाटील यांची पुन्हा उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, उद्या पत्रकार परिषदेत सर्व राजकीय भूमिका विषद करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, "मोठी पडझड होत असताना पक्षाशी प्रामाणिक राहूनही कारवाई करण्यात आली. नंतर कारवाई मागे घेतली. पक्षप्रमुखांनी भेटायला बोलाविले असता काही तथाकथित श्रेष्ठींकडून राष्ट्रवादीशी जुळवून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. ज्या मतदार संघाचे तीनवेळा प्रतिनिधीत्व केले तो मतदार संघ सोडून पु्ण्यातून लढण्याचा अजब सल्ला दिला गेला. हे सर्व अनाकलनीय होते. पुण्यातून लढायला सांगणे एकवेळ समजण्यासारखे होते. परंतू ज्यांच्याविरोधात तीन निवडणूकांबरोबरच आयुष्यभर राजकीय संघर्ष केला त्यांच्यासोबत जुळवून घ्यायला सांगणे मात्र मनाला पटले नाही. राष्ट्रवादीसोबत ॲडजेस करून त्यांचा प्रचार करा, असे जबाबदार पदाधिका-यांकडून सांगण्यात आले. परंतू ते कसे शक्य आहे." तसे करता येणे शक्य नसल्याने माझ्यासमोर त्यामुळे पर्यायच राहिला नाही आणि म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांचे नेतृत्व मान्य केले, असे त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.