कोरोनामुळे पर्यटन बदलणार; नव्या बदलांना सामोरे जावे लागणार

Tourism
Tourism

पुणे : कोरोनाच्या संकाटावर मात करून देशातंर्गत आणि परदेशातील पर्यटनासाठी आता पावले घराबाहेर पडताना, या क्षेत्राची परिभाषाच बदलणार आहे. त्यासाठी टूर्स अॅंड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी तयारी सुरू केली आहे. पुरेशी काळजी घेतली तर, पर्यटन सुरक्षित होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

महाराष्ट्रातून सर्वाधिक पर्यटक देशातच नव्हे तर परदेशातही फिरतात. त्या मागोमाग गुजरात, केरळ आणि पश्चिम बंगालचा नंबर लागतो. गेल्यावर्षी देशातून 3 कोटी पर्यटक देशाबाहेर गेले होते. यंदा हे प्रमाण साडेचार ते पाच कोटींपर्यंत जाईल, असा अंदाज होता. परंतु, पर्यटन क्षेत्र गेल्या चार महिन्यांपासून ठप्प झाले आहे. मात्र, ऑगस्टच्या अखेरीस काही प्रमाणात रेल्वे, विमान वाहतूक आणि जिल्हाबंदी झाल्यावर पर्यटन क्षेत्राला हळूहळू चालना मिळेल, असा क्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज आहे. मात्र, या पुढील काळात व्हिसाच्या अटींमध्येही बदल होतील. मेडिकल फिटनेस आणि कोरोना निगेटिव्ह सर्टिफिकीट लागेल. विम्यामध्ये साथीचे आजार कव्हर होत आहेत ना हे बघितले जाईल. तसेच या पूर्वी 100-200 च्या पटींत ग्रूप टूर्स निघत. आता त्याचे प्रमाण कमी होईल आणि एक किंवा दोन, तीन फॅमिलीच्या टूर्स निघतील. त्यात बस वापरण्यापेक्षा स्वतःचे किंवा भाडेतत्त्वावरील वाहन वापरण्याचा कल वाढेल, असाही अंदाज व्यक्त होत आहे. हॉटेल, रेस्टॉरंटच्या रूमधील स्वच्छता हा कळीचा मुद्दा असेल आणि टोपीबरोबरच मास्क आणि सॅनिटायझरदेखील सक्तीचा असेल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पर्यटन हा महाराष्ट्राचा स्थायीभाव आहे. त्यामुळे अल्पावधीतच देशातील आणि परदेशातील पर्यटन सुरू होईल. त्यामुळे बदललेल्या परिभाषेनुसार ट्रॅव्हल्स कंपन्यांनी तयारी करण्यास सुरवात केली आहे.

- झेलम चौंबाळ (केसरी टूर्स अॅंड ट्रॅव्हल्स) ः कोरोनामुळे पर्यटन क्षेत्रात अनेक बदल होणार असून त्यासाठी आम्ही तयारी सुरू केली आहे. लोकांना आता घरात बसून उबग आला आहे. त्यामुळे ते लवकरच बाहेर पडतील. त्यावेळी ते स्वतःची आरोग्यविषयक सुरक्षितता जोपासेल आणि त्यासाठी पर्यटन कंपन्यांनी सुसज्ज व्हायला हवे. 

- कॅप्टन निलेश गायकवाड (कॅ. निलेश हॉलिडेज) ः या पुढच्या काळात पर्यटकांच्या बस, हॉटेलच्या रूम्स, रेस्टॉरंट आदींमध्ये नियमितपणे निर्जुतुकीकरण करावे लागेल. सॅनिटायझर, मास्क आवश्यक होतील. तसेच पुरेशी काळजी घेऊन आपण कोरोनावर मात करू शकतो, हा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण करावा लागेल.

- अजित सांगळे (एसटीए हॉलिडेज) ः पर्यटना क्षेत्रावर आलेले संकट फार काळ राहणार नाही. लोकांना बाहेर फिरायचे आहे. त्यामुळे आम्ही लवकरच रिकव्हर होऊ. मात्र, त्यासाठी  पर्यटन मंत्रालयाने एसआेपी लवकर तयार करावी. तसेच प्राप्तीकरातून पर्यटनाला वजावट मिळावी, अशी आम्ही केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com