कौटुंबिक हिंसाचाराचे ‘पुढचे पाऊल’! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sakal

कौटुंबिक हिंसाचाराचे ‘पुढचे पाऊल’!

पुणे : ‘सुनेमुळे मुलाला आमदार (MLA) होता येत नाही, त्याचे राजकीय भविष्य अवघड आहे,’ असे सांगणाऱ्या उच्चभ्रू बाबाचे ऐकून औंधमधील (Aundh) उद्योजक (businessman) गायकवाड कुटुंबाकडून त्यांच्या सुनेचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. एवढेच नव्हे, तर सुनेवर अघोरी प्रकारही केले, या घटनेमुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना केवळ गरीब, मध्यमवर्गीयांबरोबरच समाजाच्या सर्वच स्तरांत होत असल्याचे उघड झाले. लॉकडाऊनमुळे (Lockdown) कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांचे गुन्हे दाखल होण्यास काहीसा ‘ब्रेक’ लागला होता, मात्र आता चार भिंतीच्या आत दडलेला हिंसाचार उंबरठ्याबाहेर पडू लागला आहे. (Next Step Domestic Violence)

समझोत्याचे प्रमाण समाधानकारक

लग्न झाल्यानंतर पती-पत्नीच्या सुखी संसाराची गाडी काही महिने तरी सुरळीत चालते. त्यानंतर मात्र वेगवेगळ्या कारणांवरून एकमेकांमध्ये खटके उडण्यास सुरूवात होतात. त्यातच पती-पत्नीमध्ये बाहेरील व्यक्तींचा सातत्याने होणारा हस्तक्षेपामुळे वादामध्ये आणखीनच तेल ओतण्याचे काम होते. परिणामी किरकोळ स्वरूपाच्या वादातूनही थेट काडीमोड घेण्यापर्यंतच्या घटना घडतात. गरीब, मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये अशा घटना सातत्याने घडतात. मात्र आता उच्चभ्रू, श्रीमंत कुटुंबातील स्त्रियादेखील कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमधून सुटत नसल्याची सद्यःस्थिती आहे. कोरोनापूर्वी २०१९मध्ये पुणे पोलिसांच्या ‘भरोसा सेल’अंतर्गत येणाऱ्या महिला सहाय्यता कक्षाकडे तीन हजार ९९ तक्रार अर्ज आले होते. २०२०मध्ये कोरोनामुळे उद्‌भवलेली परिस्थिती व लॉकडाऊनमुळे महिलांना पोलिसांपर्यंत पोचण्यात अडचणी आल्या. परिणामी २०२०मध्ये तक्रार अर्जांची संख्या घटून ती २०७४ इतकी झाली. तर जुलै २०२१ पर्यंत १२९४ इतके अर्ज पोलिसांकडे आले आहेत. दाखल अर्जांच्या तुलनेत प्रकरणे निकाली निघण्याचे, त्यांच्यात समझोता घडण्याचे प्रमाण समाधानकारक आहे, तर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण आत्यंतिक कमी असल्याची पोलिसांकडील आकडेवारीतून स्पष्ट होते.

जगभरातील स्थिती

२४ कोटी ३० लाख

जगभारातील महिलांनी कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केल्या आहेत.

कौटुंबिक हिंसाचाराची कारणे

पतीकडून होणारा मानसिक व शारीरिक त्रास.

सासरचे मंडळी, नणंद व नातेवाईकांकडून होणार त्रास.

बाहेरील व्यक्तींचा संसारात होणारा हस्तक्षेप.

चारित्र्यावर संशय, विवाहबाह्य संबंधावरुन निर्माण होणारा तणाव.

हुंडा व आर्थिक कारणातून होणारे वाद-विवाद.

माझ्या मुलीचा काही वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला आहे, त्यांना आता सव्वा वर्षाचा मुलगाही आहे. आता पती तिच्यावर संशय घेऊन तिला मोठ्या प्रमाणात मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास देतो, सतत घराबाहेर काढतो. विश्रांतवाडी पोलिसात तक्रार देऊनही मुलीवरील अत्याचार थांबत नाहीत. मी वृद्ध असून मधुमेही असून तिची या जाचातून सुटका कधी होईल, याकडे डोळे लावून बसले आहे.

- पीडित महिलेची आई.

कौटुंबिक हिंसाचाराची वेगवेगळी कारणे आहेत. लॉकडाऊनमुळे २०२० मध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना काही प्रमाणात कमी दिसतात. परंतु आता पुन्हा महिलांच्या तक्रार अर्जाची संख्या वाढू लागली असून ती पुन्हा अडीच हजारापर्यंत जाऊ शकतो. महिला, त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करून समझोता घडविला जातो. मात्र काही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्याकडे कल असतो, त्यानुसार आम्ही संबंधित पोलिस ठाण्यांकडे अर्ज पाठवितो.

- राजेंद्र कदम, पोलिस निरीक्षक, महिला सहायता कक्ष, भरोसा सेल.

एकमेकांशी संवाद नाही, त्यातच कोरोनामुळे मने घुसमटलेली आहेत. सुखचैनीचे जगणे आणि सहन करण्याची वृत्ती, या कारणामुळे कुटुंबांमध्ये वाद होतात. विशेषतः उच्चभ्रू कुटुंबांमध्ये पैसा व परिस्थितीची जाणीव नसते. पैशांसाठी गृहीत धरण्याबरोबरच अपेक्षांसाठी अट्टहास केला जातो. त्यातूनच कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना घडतात. मात्र एकमेकांशी मोकळेपणाने बोलल्यास पुढे वाद सुटू शकतील.

- ॲड. प्रार्थना सदावर्ते, समुपदेशक

टॅग्स :Pune News