
Kasba By Election : ‘युवक’केंद्रीत निवडणुकीसाठी आमचे मतदान महत्त्वाचे...
पुणे : निवडणूकांच्या रणधुमाळीत वंचित घटकांपासून करदात्यांपर्यंत सर्वच घटकांचा विचार केला जातो. मात्र, काही अंशी युवकांच्या प्रश्नांना बगल दिल्याचे पाहायला मिळते. राजकारण्यांच्या जाहिरनाम्यात युवककेंद्रीत धोरणे असावेत, म्हणून आम्ही मतदानासाठी आग्रहाने बाहेर पडतो, असे मत गुरूवार पेठेतील आदित्य कुंडुरकर व्यक्त करतो.
पोटनिवडणूकीच्या निमित्ताने त्याला प्रथमच मतदानाचा हक्क बजावण्यास मिळाला आहे. कसब्यातील बहुतेक मतदान केंद्रांवरील नवमतदारांनी तंत्रज्ञानाचा कुशलतेने वापर केल्याचे चित्र पाहायला मिळाले. मतदानाचे केंद्र, बुथ आणि मतदार यादी क्रमांक व्हॉट्सअपवरच प्राप्त केले होते.
त्यामुळे मतदान केंद्रावर गेल्यावर विनाविलंब मतदानासाठी उभे राहता आले. पहिलच मतदान असल्याने उत्सुकता आणि भिती दोन्हींची संमिश्र भावना जवळपास सर्वच मतदारांनी व्यक्त केली. आदित्य म्हणतो,‘‘घरच्यांनी तसेच मित्रांकडून मतदान करण्याची प्रक्रिया माहित पडली होती.
त्यामुळे फार अडचण आली नाही. देशातील लोकशाहीसाठी मतदान हे आपले कर्तव्य असून आपण ते बजावले पाहिजे.’’ सदाशिव पेठेतील प्राजक्ता देशमुख सांगतात, ‘‘विधानसभेसाठी माझे हे पहिलेच मतदान होते. खरं तर प्रत्येक पिढीतील नवयुवकांनी मतदानासाठी पुढे येत एक आदर्श निर्माण केला आहे.
एक युवक म्हणून आपल्या अपेक्षांना धोरणात्मक बाबींत उतरविण्यासाठी नेता महत्त्वाचा असून, मतदानाद्वारे आपण योग्य नेत्याची निवड करतो.’’ अचानक किंवा अनपेक्षित पद्धतीने पोटनिवडणूक लागली असली तरी, आपले प्रतिनिधीत्व विधीमंडळात असणे गरजेचे असल्याची भावनाही युवकांनी व्यक्त केली.
आपल्या आवडत्या नेत्याला निवडणून देण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे. खरं तर आपल्या मताला एवढं महत्त्व प्राप्त होणे, माझ्यासाठी नक्कीच महत्त्वाचे आहे. लोकशाहीसाठी मतदान करणे आपला प्रथम कर्तव्य आहे.
- विश्वेश झाड, कसबा
मतदान करणे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे ते बजावायला हवेच. निश्चितच प्रथमच मतदान करत असल्यामुळे एक कुतुहल होते. घरच्यांच्या मदतीने सर्व प्रक्रिया माहित करत मी मतदान केले.
- सुखमित कौर, नाना पेठ