PMPL Bus Journey : तब्बल दीड तास उभ्यानेच प्रवास, पुणेकर प्रवाशांची PMPL कडे ठोस उपायाची मागणी

घरातून निघतांना गडबडीत निघावे लागते...., त्यानंतर सलग तास ते दीड तास उभ्याने प्रवास...., त्यानंतर कार्यालयीन कामकाज....., पुन्हा येतांना उभ्यानेच प्रवास
Bus Journey
Bus Journeysakal

सिंहगड रस्ता - घरातून निघतांना गडबडीत निघावे लागते...., त्यानंतर सलग तास ते दीड तास उभ्याने प्रवास...., त्यानंतर कार्यालयीन कामकाज....., पुन्हा येतांना उभ्यानेच प्रवास आणि त्यानंतर घरी आल्यावर घरातील काम यातून जीव मेटाकूटीला येतो. किमान प्रवास तरी सुखाचा होईल असे वाटते पण ते देखील होत नाही अशा भावना कात्रज -हिजवडी दरम्यान प्रवास करणार्‍या महिला आणि तसेच पुरूष प्रवाशांनी सकाळकडे व्यक्त केल्या.

कात्रज ते हिंजवडी फेज थ्री असा बसचा त्यांना दररोज प्रवास करावा लागतो. यातील काही नागरिक तर कोंढवा परिसरात रहातात. ते कात्रज येथे येतात तेथून हिंजवडी फेज थ्री येथे नोकरी निमित्त जातात त्यावेळी बस कायम भरलेली असते. बऱ्याचदा ज्येष्ठ नागरिक महिला तर बसमधे खाली बसून जातात. कारण बसण्यासाठी जागा नसते. अशा वेळी किमान ’प्राईम टाईम’ मधे तरी जास्त बसेस सोडण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

याबाबत दिप्ती भोसले म्हणाल्या की, मी कोंढवा परिसरात रहाते. मला कात्रज येथूनच उभे राहून जावे लागते. किमान दिड तास तरी उभ्याने प्रवास करावा लागतो. सकाळ संध्याकाळ हिच अवस्था आहे. शिवाय प्रवासी जास्त असल्याने  हवा खेळती नसते. परिणामी बस मधे गुदमरते. त्यामुळे बसची गर्दीच्या वेळी संख्या वाढविणे गरजेचे आहे.

हर्षल गावंडे म्हणाले की, मी नर्‍हे येथून माझा प्रवास सुरू करतो. यात वाकडच्या पुलाजवळ उतरतो. तेथून भोसरीच्या बसने जगताप डेअरी पर्यंत पुन्हा दुसर्‍या बसने प्रवास करतो. किमान नऊ तासाची शिफ्ट असते. बसच्या प्रवासामुळे आमची शिफ्ट ही पंधरा तासाची हाेते. पाय ठेवता येत नाही अशी अवस्था असते. कित्येकदा एका पायावर उभे राहत प्रवास करावा लागतो. नाहीतर चक्क दारात लटकून प्रवास करावा लागतो.

वैष्णवी खरात म्हणाल्या की, सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस गर्दी असते. नवले पुलापासून प्रवास सुरू होतो. पण कात्रज जवळच बस पूर्ण भरलेली असते. त्यानंतर ती ‘ओव्हरलोड’ अर्थात अतिरीक्त भरून जात प्रवास करीत असते. त्यामुळे दोन्ही वेळेस पूर्ण प्रवास उभ्याने करावा लागतो. या सगळ्या प्रतिकुल परिस्थितीमुळे नागरिक स्वत:चे वाहन वापरतात.

याचा परिणाम वाहतूक कोंडी, प्रदुषण, इंधनाचा जादा वापर यावर होतो. त्यामुळे पीएमपीएलने लवकरात लवकर या सगळ्यावर ठोस उपाय योजना करून जास्त बस तात्काळ सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

यासह अनेक नागरिकांनी या प्रवासादरम्यान अशा प्रतिक्रिया दिल्यात यात प्रामुख्याने

* बस जेथून सुरू होते तेथेच पूर्ण भरलेली असते.

* त्यानंतर प्रत्येक थांब्यात प्रवासी त्यात चढत जातात तो भार अतिरिक्त असतो.

* बसमधे अनारोग्याचे वातावरण तयार होते.

* बस क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने बसमधे प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाश्यांचा जीव गुदमरतो.

* ’प्राईम टाईम’ मधे प्रवाशांच्या सोयी साठी जास्त बस सोडण्यात याव्यात. दर पाच ते दहा मिनीटांनी बस सोडण्यात याव्यात.

* काही बस स्वतंत्रपणे केवळ हिंजवडी साठीच सोडाव्यात ज्या मधेच उतरणार्‍या प्रवाशांसाठी नसतील. त्यांच्यासाठी स्वतंत्र बस द्याव्यात. मधील प्रवाशांना बस मधे चढता येईल पण उतरणारे प्रवासी केवळ हिंजवडीचे असावेत.

* बसेसची वारंवारता वाढविणे गरजेचे आहे.

* जेथे शक्य नसेल तेथे खाजगी बसेसची मदत घेऊन तात्काळ बस सेवा द्यावी.

* बस साठी ‘ओव्हरलोड अर्लाम’ अर्थात’ जादा प्रवासी वाहतूक गजर‘ असावा.

* महामार्ग सॅटेलाईट बसेस सुरू कराव्यात.

* मेट्रो कार्यान्वित करावी.

नारायण करडे नियोजन अधिकारी पीएमपीएल

सध्या बसेसची संख्या कमी आहे तीस ते पस्तीस बसेस कमी झाल्या आहेत. येत्या तीन ते चार महिन्यात बस नवीन येण्याची शक्यता असून त्यावेळी बसेसची संख्या वाढवणे शक्य होऊ शकेल, तूर्तास इतर डेपोच्या बसेस या मार्गासाठी दिलेल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com