Politics : पुणे लोकसभेच्या जागेवर तडजोड अशक्य! उमेदवारीसाठी काँग्रेसकडून 'या' व्यक्तीचे नाव चर्चेत

Maha vikas aghadi
Maha vikas aghadi

पुणे - पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा सलग दोन वेळा पराभव झाला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघावर दावा करण्यास सुरवात केली आहे. त्याचे पडसाद आज काँग्रेसच्या मुंबईतील बैठकीत उमटले. पुणे लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसचीच ताकद जास्त आहे. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघ सोडण्यावर तडजोड होऊच शकत नाही, अशी भूमिका शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत मांडली.

त्यावर पक्षाच्या नेत्यांनी ‘राष्ट्रवादीच्या मागणीकडे लक्ष न देता आपली संघटन बांधणी मजबूत करा. महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपचा पराभव नक्की आहे’ असे सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईमध्ये प्रदेश काँग्रेसतर्फे राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसीय बैठक आयोजित केली होती. आज पुणे लोकसभा मतदारसंघावर चर्चा करण्यात आली. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत भाजपने काँग्रेसचा पराभव केला आहे. पुण्यात राष्ट्रवादीची ताकद वाढल्याने पुण्याची जागा राष्ट्रवादीला सोडावी अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नुकतीच मांडली.

एकीकडे महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन भाजप विरोधात वज्रमूठ बांधत असताना पवार यांच्या वक्तव्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. त्यापार्श्‍वभूमीवर आजच्या बैठकीत चर्चा झाली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह संग्राम थोपटे, विश्‍वजीत कदम, मोहन जोशी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, रमेश बागवे, कलम व्यवहारे, गोपाळ तिवारी, अभय छाजेड, बाळासाहेब शिवरकर आदी पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीमध्ये शहरातील पदाधिकाऱ्यांनी पुणे लोकसभेमध्ये काँग्रेसची ताकद कशी आहे. राष्ट्रवादीचे १५ नगरसेवक आहेत, तर काँग्रेसचे १० नगरसेवक आहेत, दोन्ही पक्षाचे प्रत्येकी एक आमदार आहे. पण दोन उमेदवार अवघ्या पाच हजार मतांनी पडले आहेत. तर राष्ट्रवादीचा पर्वतीतील उमेदवार २५ हजारापेक्षा जास्त मतांनी पडला आहे. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघात आपलीच ताकद आहे, अशी भूमिका मांडण्यात आली. त्यास इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यास पाठिबां दिला. विश्‍वजीत कदम यांनीही तशी बैठकीत ठाम भूमिका मांडली.

सर्वांच्या भावांना ऐकून घेतल्यानंतर नाना पटोले यांनी ‘‘आपण पुणे लोकसभा मतदारसंघ सोडणार नाही. तेथे काँग्रेसचाच उमेदवार निवडणूक लढवणार आहे. पक्ष संघटना मजबूत करून, सर्वांनी समन्वयाने काम करा, पक्ष देईल तो उमेदवार निवडू आणा’’ अशी सूचना पदाधिकाऱ्यांना केली.

मनातली खदखद केली व्यक्त

या बैठकीमध्ये काँग्रेसमधील गटबाजीवर चर्चा करताना पदाधिकाऱ्यांनी मनातील खदखद व्यक्त केली. पुणे कॅन्टोन्‍मेंट हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पण आता आपल्याला तिथे का मताधिक्य मिळत नाही. सुरेश कलमाडी यांच्यानंतर तेच तेच चेहरे शहराचे नेतृत्व करत आहेत, तरुणांना संधी का मिळत नाही. महापालिकेसाठीही नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली पाहिजे.

पक्षाकडून आदेश आल्यानंतर एकदा आंदोलन केले जाते, पण त्यात सातत्य का नसते असे प्रश्‍न उपस्थित करत शहराचे नेते म्हणवून घेणाऱ्यांनी आत्मचिंतन करावे असे काही पदाधिकाऱ्यांनी बैठकीत सुनावले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

गोपाळ तिवारी यांना उमेदवारी द्या

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार कोण असणार यावर चर्चा सुरू असताना राजीव गांधी स्मारक समितीतर्फे काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे पत्र काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी यांना इमेल करण्यात आले आहे. या पत्रावर पुण्यातील विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिकांची स्वाक्षरी आहे.

कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा अनेक वर्षानंतर विजय झाला. त्यामध्ये गोपाळ तिवारी यांनी प्रभाग क्रमांक १५ मधून (सदाशिव पेठ नारायण पेठ ) भाजपचे मताधिक्य कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. काँग्रेसमधील अनुभवी व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांस उमेदवारी द्यावी अशी मागणी या पत्रात केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com