अतिरिक्त कामामुळे टपाल कर्मचारी त्रस्त

Post-Office
Post-Office

पुणे - ‘इथे लोकांना काम नाही आणि आम्ही दोन जणांचे काम एक जण करत आहोत. एका पोस्टमनने दिवसाला साधारण ६० हिशेबी आणि १५० ते २०० साधे टपाल नागरिकांच्या घरापर्यंत पोचवणे आवश्‍यक आहे; पण आम्हाला दिवसाला १२० ते १५० हिशेबी आणि ३०० ते ३५० साधे टपाल नागरिकांच्या घरी पोचवावे लागत आहेत. आम्ही करत असलेल्या दीडपट जादा कामाचा विचार सरकारने करावा, टपाल कार्यालयातील एक कर्मचारी नाव न सांगण्याच्या अटीवर ही व्यथा मांडत होता. हीच परिस्थिती कमी अधिक प्रमाणात शहरातील प्रत्येक टपाल कार्यालयात आहे.

टपाल कार्यालयांमध्ये ३५ टक्के कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. याचा अतिरिक्त भार इतर कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतो. त्यातच इंटरनेट बंद असते आणि चालू झाल्यास त्याचा वेग मंदावलेला असतो. इच्छा नसतानाही कामाचा वेग मंदावतो. याचा मनस्ताप ग्राहकांसोबतच कर्मचाऱ्यांनाही सहन करावा लागतो. 

‘प्रत्यक्ष ग्राहकांना आम्हालाच तोंड द्यावे लागते. आपले काम लवकर व्हावे, असे नागरिकांना वाटते; पण ऑनलाइन व्यवस्थाही हळू असल्यास आम्ही तरी काय करणार,’’ एक महिला कर्मचारी सांगत होती. जादा कामात आणखी भर म्हणून आधार कार्ड काढून देण्याचेही काम आम्हाला करावे लागत आहे. 

देशभरात अनेक ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी वारंवार आंदोलने केली पण सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे, अशी तक्रार एक कर्मचाऱ्याने केली.

‘ऑनलाइन’चा बोजा
हिशेबी टपाल संबंधित व्यक्तीच्या हातात देऊन त्याची स्वाक्षरी घ्यावी लागते. ऑनलाइन खरेदी-विक्री करणाऱ्या कंपन्यादेखील टपाल कार्यालयामार्फत आपल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोचवतात. त्यातून टपाल विभागाला आर्थिक उत्पन्न मिळत असले तरी अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे इतरांवर कामाचा बोजा वाढल्याची तक्रार बहुतेक कर्मचाऱ्यांनी केली.

अपुऱ्या संख्येमुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढतो आहे. आमच्या मागण्यांची अनेक निवेदन आम्ही दिली आहेत; परंतु सरकार त्याकडे लक्ष देत नाही.
- यमाजी बांबळे, सचिव, अखिल भारतीय टपाल कर्मचारी संघटना, पुणे

टपाल कर्मचारी आणि त्यांच्या कामाबाबत सविस्तर भूमिका लवकरच स्पष्ट करू.
- एफ. बी. सय्यद, असिस्टंट पोस्टमास्टर जनरल

प्रमुख अडचणी
  इंटरनेटच्या सेवेचा वेग अत्यंत कमी. सर्व्हर वारंवार डाऊन होतो.
  ३५ टक्के पदे रिक्त.
  जनरल पोस्ट ऑफिस (जीपीओ) मधील कर्मचाऱ्यांना रात्रीच्या थंडीत         उघड्या शेडखाली काम करावे लागते.
  कार्यालयांमधील टपाल उघड्यावर असते. 
  एका पोस्टमनला १५ ते २० किलोचे टपाल घेऊन फिरावे लागते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com