
Pune : सहकारी बँकांनी एकत्रित येण्याची गरज: विद्याधर अनास्कर
पुणे : राज्यातील सर्व सहकारी बँकांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज आहे. सहकार क्षेत्र वाढायचे असेल तर एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे. ब्रँड अँबेसिडर नेमून सहकारातील चांगल्या गोष्टींची प्रचार प्रसिद्धीचे काम करणे गरजेचे आहे. तसेच सहकारी संस्थांबद्दल आदर असायला हवा. असे मत राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले.
‘सकाळ’च्या सहकार महापरिषदेत सहकारातील सहकार्य विषयावर ते बोलत होते. अनास्कर म्हणाले, “सहकारात असणाऱ्यांनी कायम संस्थांच्या हिताचाच विचार करणे गरजेचे आहे. चुकीच्या गोष्टी नाकारण्याची हिमंत सहकारातील लोकांनी दाखविली तर बँका वाचतील.
प्रत्येकाने सहकारात काय योगदान देता येईल याचा विचार करणे आवश्यक आहे. सहकार क्षेत्राला सामूहिक नेतृत्वाची गरज आहे. तसेच सहकार चांगला असताना देखील सहकार इतके बदनाम का यावर आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
सहकारी संस्थांच्या निवडणुका होतात. प्रत्येकाला वाटत आपलं त्यावर वर्चस्व हवे. अनेकदा वेगवेगळ्या पॅनलचे लोक निवडून आल्याने बँकेत संघर्षाला सुरुवात होते. त्यामुळे सहकारातील निवडणूका पॅनल पद्धतीने व्हाव्यात का हा खरा प्रश्न आहे.
संचालक मंडळातील दुहीमुळे सहकारातील सेवा अनेकदा होत नाही. गटबाजीमुळे बँकेतील कर्मचारी आणि बँकांच्या कामावर परिणाम होतो. आपणच आपल्या बँकेला अडचणीत आणत असतो. त्यावर खऱ्या अर्थाने विचार प्रत्येकाने विचार करावा असे देखील अनास्कर म्हणाले.
- बँकेतील प्रत्येक संचालकला वेगवेगळ्या विभागाचे काम द्यायला हवे.
- त्यामुळे प्रत्येकाला आपण सहकारात काम करतोय असे वाटेल.
- सहकारी बँकांनी सुद्धा सहकारात सहकार जोपासला पाहिजे तरच सहकार टिकेल.
- सहकारात अनेक यशस्वी उदाहरणे आहेत ती लोकांसमोर यायला हवीत
- अनेक सहकारी बँका गुप्तता पाळण्यात स्वतःला धन्यता मानतात
- बँक कधीच कोणत्या पक्षाची नसते ती बँक जनतेची असते
- भविष्यात काय होणार आहे याची जाणीव ठेवून बँकांनी योजना आखायला
- संपूर्ण देशात महाराष्ट्राची सहकार चळवळ चांगली आहे.
सहकरामध्ये चांगले काय आहे ते लोकांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे.
एखाद्या ठिकाणी प्रशासकांनी बँक चांगली चालविली तर त्या ठिकाणी प्रशासक जास्त दिवस राहील या भीतीपोटी अनेकदा जुने संचालक कर्जदारांना कर्ज भरू देत नाहीत. ही भूमिका चांगली नाही.