काँग्रेस सोडलेल्यांची 'घरवापसी' नाही

काँग्रेस सोडलेल्यांची 'घरवापसी' नाही

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या काळात पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेऊ नये. तसेच, पक्षात राहून पक्षाने दिलेल्या उमेदवारांच्या विरोधात काम करणाऱ्यांवर कारवाई करावी, असा ठराव शहर कॉंग्रेसच्या बैठकीत रविवारी करण्यात आला. भाजपची सत्ता असताना कॉंग्रेसमधील काही नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी विविध समित्यांवर लावून घेतली, त्यांना येथून पुढे कोणतेही पद देऊ नये, अशी मागणीही करण्यात आली. 

केंद्र सरकारच्या विरोधात अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या वतीने येत्या 14 डिसेंबरला दिल्लीत "भारत बचाव रॅली' काढण्यात येणार आहे. त्याचे नियोजन करण्यासाठी शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. या वेळी राज्यात सत्तेवर आलेल्या उद्धव ठाकरे सरकारचे आणि विधानसभा सभापतिपदी नाना पटोले यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पक्षाची बैठक झाली नव्हती. या बैठकीच्या निमित्ताने संतप्त कार्यकर्त्यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली. पक्ष सोडून गेलेल्या आणि स्वत:ला निष्ठावान म्हणविणारे; परंतु पक्षविरोधी काम केलेल्या सर्वांवर कार्यकर्त्यांनी जोरदार टीका केली. पक्षश्रेष्ठींनी यांची दखल घेतली नाही, तर कॉंग्रेस भवन येथे उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला.

या वेळी बागवे यांच्यासह बाळासाहेब शिवरकर, रोहित टिळक, अरविंद शिंदे, दत्ता बहिरट, अजित दरेकर, अविनाश बागवे, सोनाली मारणे, सुनील शिंदे, वैशाली मराठे, संगीता तिवारी, रमेश अय्यर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. 
बागवे म्हणाले, ""गेल्या पाच वर्षांत भाजपची सत्ता असताना पक्षातील नेत्यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना शासकीय समित्या मिळवून देण्यासाठी शिफारस केली. त्यांच्याबद्दल पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्यात येणार असून, भविष्यात असे नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पक्षात कोणतीही संधी दिली जाणार नाही.'' 

शिंदे म्हणाले, ""स्वत:ला कॉंग्रेस निष्ठावान समजणाऱ्या काही नेत्यांनी मी बाहेरचा म्हणून निवडणुकीत मदत केली नाही. नेतेमंडळी आली की पुढे-मागे करणे एवढेच काम हे करतात. या उलट कार्यकर्त्यांची खरी मदत झाली.'' बहिरट यांनीही निवडणुकीदरम्यान आलेले अनुभव सांगितले. सुमारे दोन तास झालेल्या बैठकीत अनेक नेत्यांनीही आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. 

सोनिया गांधींना अहवाल सादर करणार 
विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेले तिन्ही उमेदवार पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची लवकरच भेट घेणार आहेत. उमेदवार त्यांना भेटून अहवाल सादर करणार आहेत. काही नेत्यांनी पक्षाविरोधात केलेली कामे, शहरपातळीवर नेत्यांनी निवडणुकीकडे फिरविलेली पाठ, बंडखोरी थांबविण्यासाठी झालेले प्रयत्न आदी गोष्टी त्यांच्या कानावर घालण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com