पुणे-नाशिक महामार्ग ''अंधारा''त

पुणे-नाशिक महामार्ग ''अंधारा''त
Published on

विलास काटे : सकाळ वृत्तसेवा

आळंदी, ता. २० :  पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव ते चाकण हा ४६ किलोमीटरचा टप्पा रात्रीच्या वेळी मृत्यूचा सापळा बनला आहे. उड्डाणपुलांवरील बंद दिवे, अदृश्य दुभाजक आणि सूचनाफलकांचा अभाव यांमुळे गंभीर अपघात होत आहेत. टोल वसूल करूनही राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.
अपघात टाळण्यासाठी नारायणगाव, मंचर आणि राजगुरुनगर शहरांबाहेर बाह्यवळणमार्ग काढण्यात आले असले, तरी नियोजनातील त्रुटींमुळे अपघातांचे सत्र सुरूच आहे. नाशिकहून पुण्याकडे येताना नारायणगावजवळील उड्डाणपुलावर दिवे अनेकदा बंद असतात किंवा लुकलुकतात, ज्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. चाकण शहरातील दोन्ही उड्डाणपुलांवरही दिव्यांची सोय नाही. चाकणजवळील आंबेठाण चौक आणि तळेगाव रस्त्यावरील मुख्य चौकातील सदोष उड्डाणपुलांमुळे रस्ता ओलांडताना गोंधळ उडतो.
रस्त्यावरील छोटे दुभाजक आणि त्यावरील रिफ्लेक्टरच्या अभावामुळे रात्रीच्या वेळी अंदाज येत नाही. पेठ, निघोटवाडी, कळंब यांसारख्या भागांतील गतिरोधक अंधारात दिसत नाहीत. अनेक ठिकाणी गतिरोधक दर्शवणारे फलक गायब झाले आहेत. पेठ ते राजगुरुनगर मार्गावरील तीव्र उतारावरही वळण दर्शवणारे फलक नसल्याने धोका वाढला आहे. वाकी पुलावरून चाकणकडे येताना अचानक लावलेल्या गतिरोधकामुळे अनेक छोटे-मोठे अपघात घडतात. या सर्व त्रुटींमुळे गेल्या ३-४ वर्षांत अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे.

दुभाजक फोडून अपघातांना निमंत्रण
पुणे-राजगुरुनगरपासून चाकणपर्यंत अनेक ठिकाणी व्यावसायिकांनी सोयीसाठी दुभाजक तोडले आहेत. यातून अचानक वाहने महामार्गावर येतात, ज्यामुळे वेगात असलेल्या वाहनांना अंदाज येत नाही आणि अपघात घडतात. वाकी ते चाकणदरम्यान हे प्रकार नित्याचे झाले आहेत.

रात्रीच्या वाहतुकीचा भार मोठा 
हा मार्ग शेतकरी, कामगार आणि उद्योगांसाठी महत्त्वाचा आहे. रात्रीच्या वेळी शेतमाल, औद्योगिक वस्तूंची वाहतूक करणारी अवजड वाहने, कामगारांच्या दुचाकी-चारचाकी आणि तीनचाकी वाहनांची मोठी वर्दळ असते. या वाढत्या वाहतुकीमुळे सुरक्षिततेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com