सिंहगड: पूर्ण खरिप हंगामात पावसाने ओढ दिल्याने भात, बाजरी व इतर कडधान्याची पिके धोक्यात आली असून उत्पन्न घटनार असल्याने उत्पादन खर्च तरी निघतो की नाही या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे. पेरणीपासून एकही मोठा पाऊस न झाल्याने सध्या पिकं जेमतेम उभी दिसत असून
उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याचा अंदाज कृषी अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. मागील काही वर्षांपासून अतिवृष्टीमुळे नुकसान सहन करत आलेल्या पश्चिम हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांना यावर्षी कमी पावसामुळे नुकसान सहन करावे लागणार असल्याचे दिसून येत आहे.
पश्चिम हवेलीतील किरकटवाडी, खडकवासला, नांदोशी-सणसनगर, गोऱ्हे बुद्रुक,डोणजे, घेरा सिंहगड, गोऱ्हे खुर्द, खानापूर, मालखेड सोनापूर, आंबी, कुडजे,बहुली, आगळंबे, खडकवाडी, मांडवी, बहुली, सांगरुन व खेडशिवापूर परिसरातील गावांमध्ये खरिप हंगामात मुख्यतः भाताचे पीक घेतले जाते.
यावर्षी पावसाने ओढ दिल्याने भात लावणीस दिड ते दोन महिने उशीर झाला. पाऊस कमी झालेला असताना शेतकऱ्यांनी पुढे पाऊस होईल या आशेवर भातलावणी करुन घेतली मात्र अद्यापही पुरेसा पाऊस न पडल्याने भात पिकासह बाजरी, सोयाबीन व इतर कडधान्याच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. मशागत, मजुरी, खते, बियाणे व इतर गोष्टींसाठी केलेला खर्च मिळणाऱ्या उत्पन्नातून निघतो की नाही अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.
हवेली तालुक्यातील खरिप लागवड
पिक/ क्षेत्र(हेक्टर)
•भात/2163
•बाजरी/650
•सोयाबिन/606
•मुग/60
•उडीद/5
•मका/84
•भुईमुग/291
विमा भरण्याबाबत उदासिनता?..... अनेक वेळा विमा भरलेला असताना व अतिवृष्टी किंवा गारपीटीमुळे पिकांचे नुकसान झालेले असताना शासनाकडून नुकसानभरपाई न मिळाल्याने किंवा विमा कंपन्यांकडून मोबदला न मिळाल्याने पश्चिम हवेलीतील शेतकरी विमा भरण्याबाबत उदासिन असल्याचे दिसून येत आहे. 2019 मध्ये अतिवृष्टीत सर्व शेती उध्वस्त झालेली असताना पश्चिम हवेलीतील शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही.
"यावर्षी अजून एकही मोठा पाऊस झालेला नाही. रिमझिम पावसावर भातलावणी केली पण आता पाणी नसल्याने भात पिवळा पडला आहे. केलेला खर्चही निघतो की नाही अशी परिस्थिती आहे." नंदा हगवणे, शेतकरी, किरकटवाडी.
"पाणी नसल्याने पिकांना तेज दिसत नाही. भाताच्या खासरामध्ये अक्षरशः भेगा पडल्या आहेत. पाऊस नसल्याने मुग, चवळी आणि बाकीच्या पिकांवरही परिणाम झाला आहे. आता पाऊस आला तरी खूप उशीर झाल्याने त्याचा जास्त फायदा होणार नाही. पुढील हंगामात तरी पाऊस पडेल या आशेवर आहोत." संजय माताळे, शेतकरी गोऱ्हे खुर्द.
"पावसाने ओढ दिल्याने खरिपातील पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. कृषी विभागामार्फत परिसरातील पिकांचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्याचा अहवाल पाठविण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला असेल त्यांना नियमानुसार अग्रीम रक्कम मिळेल. परिस्थितीनुसार पिके वाचविण्यासाठी कृषी अधिकारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत." सुरज मडके, पुणे उपविभागीय कृषी अधिकारी.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.