समाजकार्यासाठी व्यायामातून जुळले ‘बंध मैत्रीचे’!

समाजकार्यासाठी व्यायामातून जुळले ‘बंध मैत्रीचे’!

पुणे - शहरात फिरायला किंवा व्यायामाला जाणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे, त्यातून ‘हाय... हॅलो...’ सुरू होऊन स्वभावाचे धागे जुळतात आणि समूह बनायला लागतात. हा आमचा सकाळचा ग्रुप आहे बरं का, असे सांगणारे खूप लोक भेटतात. या ‘ग्रुप’च्या काही सामायिक गोष्टी नंतर ठरून जातात आणि तो एक दैनंदिनीचा अपरिहार्य भाग बनून जातो. अशाच एका ग्रुपची घट्ट मैत्री झाली; पण तो नेहमीसारखा ‘ग्रुप’ न राहता सामाजिक कार्यालाही त्यांनी त्यांच्या दैनंदिनीचा भाग बनवले आहे. त्याची ही सर्वांसाठी अनुकरणीय कथा. 

सोलारिस हा पुण्यातील नावाजलेला क्‍लब आहे. येथे अनेक नामांकित मंडळी सकाळी जिमसाठी येत असतात. त्यात उच्चपदस्थ नोकरदार, उद्योजक, व्यावसायिक, सल्लागार, राजकीय मंडळींचाही समावेश असतो. प्रत्येकाचा रोजचा नित्यक्रम ठरलेला असल्याने त्याचवेळी भेटीगाठी होत. त्यातून ओळखी वाढल्या आणि ओळखीतून गप्पा. गप्पांच्या माध्यमातून एकमेकांना जाणून घेण्याची चांगली संधी मिळते. बघता, बघता हा ग्रुप तिसेक लोकांचा झाला. एकमेकांचे विचार जुळायला लागले आणि त्यातून विविध उपक्रम सुरू झाले. रोजचा अड्डा तर जमलाच, शिवाय कार्यक्रमांना एकत्रितपणे जाणे आणि समूह सहलीही सुरू झाल्या. आपण इथपर्यंत कसे पोचलो, आयुष्यातील ‘टर्निंग पॉइंट’ कोणता होता, या गोष्टींची आदान-प्रदान झाली. त्यानंतर राजकीय विषयांबरोबरच सामाजिक विषयांवरही चर्चा झडू लागल्या. एकत्र येण्यामुळे निर्माण झालेले नाते अधिक काळ टिकावे म्हणून त्याचे ‘बंध मैत्रीचे’ असे नामकरण करून त्याला सामाजिक कार्याची जोड देण्याचे ठरले. ही सर्व मंडळी तीस ते पन्नास वयोगटातील आहेत.

आपण आज यशाच्या शिखरावर आहोत, संपन्न आहोत, यात समाजाचा काही तरी वाटा निश्‍चितच आहे, असे सर्वांचे एकमत बनले. समाजाचे आपल्यावर ऋण आहेतच त्यातून काही प्रमाणात उतराई होण्याचा प्रयत्न म्हणून शिक्षण घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना आपण मदत करू, असा निर्णय ‘बंध मैत्रीचे’ ग्रुपने घेतला. 

गरीब परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही, त्यामुळे भविष्य भरकटते. म्हणूनच शिक्षणासाठी मदत हा विषय निवडण्यात आला. दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या ग्रुपने पहिल्या वर्षी अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्याचे शैक्षणिक शुल्क भरले. दुसऱ्या वर्षी बरचे विद्यार्थी त्यांच्याकडे आले. त्यातून अधिक निकड असलेल्या तीन विद्यार्थ्यांची निवड केली. तिघेही अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेत. 

यंदा त्यांचे शुल्क ‘बंध मैत्रीचे’ने भरले. या चारही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत भरण्याचा संकल्पच ‘बंध मैत्रीचे’ने केला आहे. जणू त्यांनी या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचे पालकत्वच स्वीकारले आहे. या गरीब विद्यार्थ्यांचे फुललेले चेहरे पाहून ‘बंध मैत्रीचे’ सदस्यांचे चेहरे समाधानाने ओथंबले आणि यासारखे दुसरे समाधान नाही या भावनेतून या ग्रुपने दरवर्षी असे गरजू विद्यार्थी शोधून त्यांना मदत करण्याच्या उपक्रमाची व्याप्ती आणखी वाढवायची, असा संकल्प केला. शिक्षणातूनच एका व्यक्तीची नव्हे, तर कुटुंबाची आणि पर्यायाने समाजाची प्रगती साधते हा अनुभव ग्रुपच्या सदस्यांना असल्याने त्यांना याची चांगली जाणीव आहे. अनेकांनी अगदी शुन्यातून आपले विश्‍व उभे केले आहे.

भावना कर्तव्याची....
या विद्यार्थ्यांना मदत करताना काही पथ्ये पाळण्याचे ‘बंध मैत्रीचे’ ग्रुपने निश्‍चित केले आहे. मदतीचा हात पुढे करताना विद्यार्थ्यांच्या डोक्‍यावर उपकाराचे ओझे राहू नये, याची दक्षता घेतली जाते. केवळ सामाजिक कर्तव्य आणि जबाबदारीच्या भावनेतून मदत दिली जाते आणि त्याचा कसलाही गाजावाजा होणार नाही, याचीही दक्षता घेतली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com