आयुर्मान वाढले दहा वर्षांनी 

आयुर्मान वाढले दहा वर्षांनी 

पिंपरी - गेल्या तीन दशकांत महाराष्ट्रवासीयांचे आयुर्मान जवळपास दहा वर्षांनी वाढले असून, नव्वद दशकात सरासरी 55 इतके असलेले आयुर्मान आता (2017) थेट 65 ते 69 च्या घरात पोचले आहे. याच काळात पहिल्या क्रमांकावरील आजार असलेला "डायरिया' चे स्थान आठव्या क्रमांकावर घसरले असून, "प्रिटर्म डिलिव्हरी'चे प्रमाणही चार टक्‍क्‍याने घसरले आहे. ही आकडेवारी राज्यासाठी आनंददायी असली, तरी पाचव्या स्थानावरील हृदयरोगाने थेट पहिला क्रमांक गाठला आहे. त्या पाठोपाठ फुफ्फुसाशी संबंधित रोगांनी सहावरून दुसऱ्या क्रमांकावर उडी घेतली आहे. 

आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धती, जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे राज्यातील आरोग्याचे चित्र वरकरणी सुधारताना दिसत असले, तरी काही असंसर्गजन्य आजारांनी डोके वर काढल्याचे राष्ट्रीय आरोग्य अहवालातून स्पष्ट झाले आहे. 1990 ते 2016 पर्यंत भारतातील विविध राज्यांची आरोग्य परिस्थिती दर्शविणारा आरोग्य अहवाल केंद्र शासनाने नुकताच जाहीर केला. केंद्रीय शासकीय स्तरावर प्रथमच अशा प्रकारचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असून, विविध प्रकारच्या आजारांसह विविध सामाजिक घटकांचाही त्यामध्ये बारकाईने अभ्यास करण्यात आला आहे. 

"इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च', "पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया' आणि "इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्‍सॅंड एव्हेल्युएशन' यांनी एकत्र येऊन हा अहवाल तयार केला आहे. या अहवालाच्या आधारे 2017 ते 2020 दरम्यान देशाच्या आरोग्य व्यवस्थेचे योग्य नियमन आणि नियोजन करता यावे, हा त्यामागील हेतू असल्याचे सार्वजनिक आरोग्यतज्ज्ञ डॉ. राम गुडगिला यांनी सांगितले. 

महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य स्थितीचाही अहवालामध्ये स्वतंत्रपणे गोषवारा घेण्यात आहे. त्यामध्ये 1990 मध्ये असलेल्या आजारांची क्रमवारी, त्याचे धोके आणि मृत्यूची तुलना 2016- 17 या आर्थिक वर्षाशी करण्यात आली आहे. 

अहवालाच्या ठळक बाबी 
- 15 ते 39 वयोगटांतील सर्वाधिक म्हणजेच 16.2 टक्के मृत्यू आत्महत्या आणि हिंसेतून होत असल्याची धक्कादायक माहिती या अहवालातून समोर आली आहे. 
- त्याखालोखाल 13.0 टक्के मृत्यू हृदयरोगाने होत असून, रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण 12.3 टक्के आहे. तर, एचआयव्ही-एडस्‌मुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 10.7 व चेतासंस्थेच्या आजाराअंती मृत्यूचे प्रमाण 11 टक्के आहे. 

- अकाली मृत्यूंत असंसर्गजन्य व अन्य आजारांचा वाटा 63.6 टक्के आहे. तर, 36. 3 टक्के नागरिक विविध आजारांनी ग्रस्त असून, त्यातून ते शारीरिक व वैद्यकीयदृष्ट्या असमर्थ ठरत आहेत. 

- ज्ञानेंद्रियांच्या आजाराचे प्रमाणही गेल्या तीन दशकांत दुपट्टीने वाढले आहे. धोकादायक आजारांच्या वर्गवारीत या आजारांनी सोळावरून पाचवा क्रमांक गाठला आहे. 

- संसर्गजन्य आजारांचे स्थान असंसर्गजन्य आजारांनी पटकावल्याचे अहवालातून स्पष्ट होत आहे. असंसर्गजन्य विकारात उच्च रक्तदाब अग्रक्रमांकावर असून त्यानंतर मधुमेह, कोलेस्ट्रॉल वाढीचा क्रमांक लागतो. 

- भारतात बालमृत्यूचे (पाच वर्षांखालील) प्रमाण 39. 2 टक्के असले, तरी महाराष्ट्रात हेच प्रमाण 27. 5 टक्के इतके मोठे आहे. जन्मत: असलेल्या आजारांमुळे 45.4 टक्के बालके (0 ते 14 वयोगट) मृत्युमुखी पडत असून, पोषण आहाराच्या कमतरतेमुळे 1. 8 टक्के बालकांना आपल्या प्राणाला मुकावे लागत आहे. 

- क्षयरोगाचे प्रमाण गेल्या तीस वर्षांत मोठ्या संख्येने घटले असून, 1990 पर्यंत चौथ्या क्रमांकावर असणारा हा रोग 12 व्या क्रमांकावर आला आहे. त्यापाठोपाठ नवजात अर्भकांचे आजार, मेंदूशी निगडित आजार आणि गोवरसारख्या आजारांमध्ये मोठी घट नोंदली गेली आहे. तर, ऍनिमिया, प्रसूतीपूर्व बाळंतपणातील गुंतागुंत आणि स्ट्रोकचे (उदा. अर्धांगवायू) प्रमाण लक्षणीयरीत्या वाढलेले दिसून आले आहे. 

- आरोग्यपूर्ण जीवनास धोका निर्माण करणाऱ्या आजारांमध्ये बालकुपोषण कायम असून, पोषक आहाराची कमतरता (11.5 टक्के), उच्च रक्तदाब (10.4), वायू प्रदूषण (8.6), रक्तशर्करा (7.1) पहिल्या पाचमध्ये आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com