#PuneRains कात्रज घाटात राडारोडा

कात्रज घाट - रस्त्याच्या कडेला टाकलेल्या कचऱ्यामुळे पावसाचे पाणी तुंबत असून, त्याचा वाहतुकीलादेखील अडथळा ठरत आहे.
कात्रज घाट - रस्त्याच्या कडेला टाकलेल्या कचऱ्यामुळे पावसाचे पाणी तुंबत असून, त्याचा वाहतुकीलादेखील अडथळा ठरत आहे.

पुणे - आंबिल ओढ्याच्या पुराने शेकडो घरादारांचे-वाहनांचे नुकसान तर केलेच; पण त्याचबरोबर माणसांचेही जीव घेतले. या पुरामागचे कारण येऊन ठेपले ते ओढ्यावरील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांवर. अर्थात हे वास्तव असले, तरी या पुरामागची आणखी एक गोम आहे, ती म्हणजे कात्रज घाट. या घाटातील पाणी वाहून नेणारी गटारे कायमच कचरा आणि राडारोड्याने भरलेली असतात. परिणामी, तेथील पाण्याचा लोंढाही या पुराला कारणीभूत ठरत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

कात्रज घाटातील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी गटारांची व्यवस्था आहे. मात्र, ती असून नसल्यासारखीच. कारण, या रस्त्याच्या दोन्ही कडा राडारोडा आणि कचऱ्याने भरल्या आहेत. त्यामुळे घाटातील पावसाच्या पाण्याला जाण्यासाठी वाटच नाही. परिणामी, हे पाणी डोंगरावरून थेट खाली येऊन भिलारेवाडीतील ओढ्याला मिळते. त्यामुळे हाच पूर पुढे आंबिल ओढ्याला येऊन मिळतो. घाटातील हा प्रवाह गटारांद्वारे थेट महापालिकेच्या पावसाळी गटारांना जोडण्याची योजना काही वर्षांपूर्वी प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, पुढे तिचे काहीच झाले नाही. याकडे ना सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष दिले ना महापालिकेने. त्यामुळे हा प्रश्‍न नेहमीच भेडसावत राहणार आहे.

घाटात सध्या कचरा व राडारोड्याचे ढीग साचलेले दिसत आहेत. धोकादायक वळणांवर पसरलेला कचरा वाहतुकीस अडथळा ठरत आहे. वाहनचालकांना अडथळ्यांची शर्यत पार करताना कसरत करावी लागत आहे. दरीतही कचरा टाकला जात आहे. कात्रज परिसरातील व्यावसायिक हा कचरा आणून टाकतात. बांधकाम व्यावसायिकदेखील रात्री या ठिकाणी राडारोडा टाकत आहेत. भिलारेवाडी, मांगडेवाडी, निंबाळकरवाडी या ठिकाणी सक्षम घनकचरा व्यवस्थापन नाही. त्यामुळे परिसरातील कचरा घाटात आणून टाकला जात आहे. घाटात कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सातत्याने दिले जात आहे. मात्र, आजपर्यंत कारवाई न झाल्याने ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

घाटात राडारोडा आणि कचरा मध्यरात्री टाकला जातो. महापालिका, परिसरातील ग्रामपंचायती आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने लवकरच संयुक्त पाहणी करून याबाबत उपाययोजना करण्यात येतील.
- एच. आर. चौगुले, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (दक्षिण पुणे)

घाटामध्ये परिसरातील ग्रामपंचायती आणि कात्रजमधील व्यावसायिक कचरा टाकत आहेत. रात्रीच्या वेळी तो घाटात आणून टाकला जात आहे. परिणामी, रस्ता वाहतुकीसाठी अपुरा पडत आहे. पावसाचे पाणीही या कचऱ्यामुळे वाहून जाण्यात अडथळा येत आहे.
- किरण सातुरे, प्रवासी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com