
रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू असून गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
Rajnish Sheth : पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने
पुणे - रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू असून गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिली.
गंभीर गुन्हे उघडकीस आणणारे पोलिस अधिकारी तसेच तपास पथकाला केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडून सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदक बुधवारी (ता. १५) जाहीर करण्यात आले. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली.
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत बुरडे, पोलिस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, अतिरिक्त पोलिस महासंचालक सुनील रामानंद, विशेष पोलिस महानिरीक्षक सुरेशकुमार मेखला, सुधीर हिरेमठ, पोलिस अधीक्षक दिनेश बारी आदी यावेळी उपस्थित होते. राज्यात २०१८ ते २०२१ या कालावधीत घडलेल्या गंभीर गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या ४३ पोलिस अधिकाऱ्यांना पदक मिळाले आहे. पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांच्या हस्ते हे पदक प्रदान करण्यात आले.
पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्याप्रकरणात विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. या प्रकरणात एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. रत्नागिरी पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तपास योग्य पद्धतीने सुरू आहे, असे सेठ यांनी सांगितले.
तर नागरिकांचा पोलिसांवरचा विश्वास वाढेल -
पोलिसांच्या कामकाजात गुन्ह्यांचा तपासाला महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गंभीर गुन्ह्यात आरोपींना शिक्षा होण्यासाठी पोलिसांना काही मार्गदर्शनपर सूचना देण्यात आल्या आहेत. त्यादृष्टीने मार्गदर्शनपर नियमावली तयार करण्यात आली आहे. गंभीर गुन्ह्यांचा छडा लावून आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा झाल्यास तक्रारदार आणि नागरिकांचा पोलिसांवरचा विश्वास वाढेल, असे सेठ यांनी सांगितले.