Pune : शिंदे-फडणवीस सरकारची सात महिन्यातच 42 कोटींची जाहिरातबाजी

विविध योजनांवर 'होऊ दे खर्च'
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस sakal

सोमेश्वरनगर : शिंदे-फडणवीस यांचे सरकार सत्तेत येऊन सातच महिने झाले आहेत पण या कालावधीत या सरकारने जाहिरातीवर खर्च केलेली रक्कम पाहून सामान्य माणसाचे डोळे दिपणार आहेत. कारण सात महिन्यात सरकारने जाहिरातबाजीवर तब्बल ४२ कोटी ४४ लाख रूपये खर्च केले आहेत.

माहिती अधिकारातून ही बाब उघड झाली आहे. नुसत्या हर घर तिरंगा अभियानासाठी जाहिरातीवर तब्बल 10 कोटी खर्च झाले आहेत.

करंजेपूल (ता. बारामती) येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी ही माहिती मागविली होती. त्यामध्ये सात महिन्यात सामान्य जनतेकडून वसूल झालेल्या कररूपी पैशातून कोट्यवधी रूपये जाहिरातीवर खर्च झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

२०१९ मध्ये सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकार पाडून भाजप व एकनाथ शिंदे यांच्या गटाने सत्ता हस्तगत केली होती. यानंतर शिंदे-फडणवीस यांचे सरकार जून २०२१ मध्ये सत्तेवर आले होते. त्यानंतरच्या सातच महिन्यात विवध प्रकारच्या सरकारी जाहिरातींवर ४२ कोटी रूपयांची उधळपट्टी केल्याची बाब समोर आली आहे.

दिवसाला १९ लाख ७४ हजार रूपये इतका खर्च या सरकारने केला आहे. हर घर तिरंगा उपक्रमासाठी १० कोटी ६१ लाख रूपये कर्च झाला आहे. केंद्रसरकारच्या कोरोना आजारावरील बुस्टर डोसच्या जाहिरातींवर ८६ लाख ७० हजार रूपये गेले आहेत. राष्ट्रनेता (नरेंद्र मोदी) ते राष्ट्रपिता (महात्मा गांधी) या पंधरवड्यासाठी सप्टेंबरमध्ये तब्बल ४ कोटी ७२ लाख ५८ हजार रूपयांची उधळपट्टी केली असून बहुचर्चित जी-२० उपक्रमासाठी एका दिवसात ८५ लाख १६ हजार रूपये खर्चले आहेत

मराठी भाषा विषयावर १ कोटी ७६ लाख, इंडियन सायन्स काँग्रेससाठी २ कोटी ३७ लाख इतकी महाप्रचंड रक्कम खर्च केली आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी शुभारंभ केलेल्या राज्यस्तरीय रोजगार मेलाव्यासाठी ७ कोटी ५७ लाख रूपये, मुख्यमंत्र्यांच्या ताब्यातील एमएमआरडीए विभागाने १ कोटी १३ लाख रूपये तर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने डिसेंबरमध्ये ११ कोटी ५० लाख रूपये जाहिरातीवर खर्च केले आहेत. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंतीदिवशी ९६ लाख ४० हजारांचा खर्च झाला आहे, अशी माहिती माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने दिली आहे.

यापूर्वी नितीन यादव यांनी २०१४ ते २०१९ कालावधीतील फडणवीस सरकारची माहिती मागविली होती. यामध्ये केवळ टिव्ही व रेडीओ या दोन माध्यमांवर १५ कोटी रूपये जाहिरात खर्च केल्याची बाबही उघड झाली होती. तर जतीन देसाई यांनी मागविलेल्या माहितीत मोदी सरकारने २०१९-२० या एकाच वर्षात ७१३ कोटी खर्च केल्याची बाब उघड झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com