
Pune : गिर्यारोहकांकडून तानाजी मालुसरेंना अनोखी मानवंदना
कात्रज : माघनवमी ही नरवीर तानाजी मालुसरे यांची ३५३वी पुण्यतिथी असून याच दिवशी त्यांनी सिंहगड किल्ला जिंकला परंतु त्यांना वीरमरण आले. मुलाचं लग्न उघड्यावर टाकून "आधी लगीन कोंढाण्याचं मग माज्या रायबाचं" असं म्हणत तानाजी मालुसरे उदयभान राठोड नावाच्या किल्लेदारावर धाऊन गेले.
घनघोर युद्धात तानाजी मालुसरे यांना वीरमरण प्राप्त झाले. त्यांचे बंधू सूर्याजी मालुसरे वयानं जेष्ठ शेलार मामां व अन्य मावळ्यांनी गड ताब्यात घेतला मात्र शिवरायांचा बालमित्र अन मराठी मूलकाचा सिंह धारातीर्थी पडला. याच प्रसंगामुळे कोंढाणा किल्याला सिंहगड असे नाव पडले.
जो कडा सर करून तानाजी अष्टमीच्या रात्री किल्ल्यावर गेले होते. त्याच काळोख्या रात्री हा कडा सर करून सिंहगडावर जाऊन त्यांना अनोखी मानवंदना देण्याचे पुण्यातील ७ गिर्यारोहकांनी ठरवले. सुमारे साडेतीनशे वर्षांपुर्वीचा इतिहास त्याचप्रकारे अनूभवण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला.
आज आपण ज्याला तानाजीकडा म्हणून ओळखतो तोच कडा अष्टमीच्या रात्री अकरा वाजता चढण्यास सुरु केला सलग सहा तास चढाई करून पहाटे पाच वाजता हे गिर्यारोहक किल्ल्यावर पोहोचले. रात्रीच्या अंधारात कडा सर करण्याची जोखीम अधिक असते.
एस एल एडव्हेंचरचे प्रमुख लहू उघडे यांच्या नेतृत्वाखाली कसलेले गिर्यारोहक कृष्णा मरगळे, तुषार दिघे, मानसिंह चव्हाण, मंगेश सांबरे, शैलेश थोरवे, प्रसाद बागवे, युवराज गटक्कल, विनोद गायकवाड यांनी ही मोहीम यशस्वी करून शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना अनोखी मानवंदना दिली.