पुणे: लग्नाला जेमतेम चार महिने झालेले. आत्ता कुठे त्यांच्या संसाराची सुरवात झालेली. आपल्या मुलीचा सुखी संसाराची सुरवात आपल्या डोळ्यासमोर व्हावी, या प्रबळ इच्छेमुळे तिचे आई-वडीलदेखील छत्तीसगड येथून शेकडो किलोमीटराच प्रवास करून पुण्यात आलेले. पण, सोमवारी मध्यरात्री कोसळलेल्या भिंतीखाली त्यांचा चार महिन्यांचा संसारही चेंगारला. यात पती-पत्नी आणि मुलीचे आई-वडील अशा एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला.
राधेलाल रामनरेश पटेल (वय 25, छत्तीसगड) त्यांच्या पत्नी ममता राधेलाल पटेल (वय 22) या भिंतीच्या शेजारील एका झोपडीत राहात होते. त्यांच्या शेजारच्या दुसऱ्या झोपडीत राधेलाल यांचे सासरे जेतूलाल पटेल (वय 50) आणि प्रदेशनिन जेतूलाल पटेल (वय 45) होते. मध्यरात्री पडलेल्या भिंतीखाली या चौघांचाही मृत्यू झाला.
होळीच्या दरम्यान राधेलाल आणि ममता यांचे छत्तीसगड येथे लग्न झाले होते. तेथील प्रथेप्रमाणे लग्नानंतर करायचे धार्मिक विधीही त्यांनी पूर्ण केले. त्यासाठी लग्नानंतर महिना-दोन महिने हे नवदांपत्य छत्तासगडमध्ये राहिले होते. कामाच्या निमित्ताने गेल्या महिन्याभरपासून हे दांपत्य पुण्यात आले होते. आपल्या मुलाचा नवीन संसार आहे. मोठ्या नव्या शहरात नवीन संसाराची सुरवात होणार आहे. नव्या संसाराच्या काळजी पोटी मुलीची आई प्रदेशनिन आणि वडील जेतूलाल हे देखिल त्यांच्या बरोबर पुण्यात आले होते. आंबेगाव येथे कामाच्या ठिकाणी आठ-दहा झोपड्या होत्या. त्यापैकी दोन वेगवेगळ्या झोपड्यांमध्ये ते राहात होते, अशी माहिती त्यांचे नातेवाईक नरेंद्र पटेल (वय 17) यांनी दिली.
एकाच कुटुंबातील चौघांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. लग्नापूर्वीपासून राधेलाल पुण्यात बांधकामाच्या वेगवेगळ्या ठिकाणी काम करत होते. लग्नासाठी मार्चमध्ये ते छत्तीसगड येथील त्यांच्या मुळ गावी गेले होते. त्यानंतर ते गेल्या महिन्या-दोन महिन्यांपूर्वी पुण्यात आले होते. त्यांची पत्नी प्रथमच गाव सोडून पुण्यासारख्या मोठ्या शहरात आली होती, असेही त्यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.