
Pune News : महाविकास आघाडीचे सरकार हे दळभद्री सरकार राज्यात होते व त्यांच्यामुळे झालेली राज्याची अधोगती निस्तरण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महायुतीला साथ मिळाल्याने हे ट्रिपल इंजिन सरकार काम करणार्या प्रत्येकाला पाठबळ देत औद्योगिक विकास व रोजगारासह विविध योजनांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करीत आहे, असे प्रतिपादन यांनी केले आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत स्वतंत्र उप विभागीय महसूल कार्यालयाचे उद्घाटन व विविध विकासकामांचे भूमीपूजन राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या जाहीर सभेत बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले.
दौंड मतदारसंघाचे आमदार राहुल कुल यांनी स्वागत करून मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेतला. माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर, माण मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे व माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ` महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दिसलेच नाहीत. त्या काळात राज्याचे प्रमुख म्हणून ` तुमचे कुटूंब, माझी जबाबदारी ` अशा पध्दतीने काम करून राज्याला आधार देण्याची गरज होती.
प्रत्यक्षात उध्दव ठाकरे यांनी ` माझे कुटूंब, तुमची जबाबदारी ` प्रमाणे काम केल्याने जनतेची जबाबदारी घ्यायला कोणी तयार नव्हते. कोरोना साथीच्या आजाराच्या काळात लोकांच्या नोकर्या गेल्या, उद्योग व व्यवसाय ठप्प झालेले असल्याने अडचणीत सापडलेल्या जनतेला वैद्यकीय व अन्य मदत करण्याची नितांत गरज असताना महाविकास आघाडीचे नेते परदेशात व थंड हवेच्या ठिकाणी निघून गेले. `
राज्यातील सामाजिक परिस्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले, ` महापुरूषांचे नाव घेतले जाते परंतु त्यांच्या विचारांचा आधार घेत पुढे जाण्याचा प्रयत्न होत नाही. अर्थकारणाशी जुळवून घेत विकास साधण्यासाठी आत्मचिंतनाची गरज आहे. आता सामाजिक व सार्वजनिक कामे घेऊन लोकांनी चर्चा केली पाहिजे.`
उप विभागीय अधिकारी मिनाज मूल्ला, तहसीलदार अरूण शेलार, आदी उपस्थित होते. नंदकुमार पवार यांनी प्रास्तिविक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देशाचे अर्थकारण गतीमान होत आहे. उद्योग आणि रोजगारात वाढ झाली असून अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या चीन एेवजी भारतात गुंतवणुकीला प्राधान्य देत आहे. महाराष्ट्रात गुगल सारखी कंपनी दहा हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे व त्यासाठी भुखंडाची मागणी राज्य सरकारकडे केलेली आहे, अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.