
Vidhan Sabha 2019 : पुणे : ''राजकीय आखाड्यात पुर्वी शरद पवार शक्तीशाली पैलवान होते, मी ही त्यांच्या तालमीत तयार झालो. पण आता महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि मी असे तीनच पैलवान आहे. विधानसभेची कुस्ती आम्हीच जिंकू,'' असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला.
Vidhan Sabha 2019 : पुणे : ''राजकीय आखाड्यात पुर्वी शरद पवार शक्तीशाली पैलवान होते, मी ही त्यांच्या तालमीत तयार झालो. पण आता महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि मी असे तीनच पैलवान आहे. विधानसभेची कुस्ती आम्हीच जिंकू,'' असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. खासदार गिरीश बापट, रिपाइंचे शहराध्यक्ष अशोक शिरोळे आदी यावेळी उपस्थित होते. आठवले म्हणाले, ''काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत राहून निवडून येण्याची शक्यता कमी असल्याने या पक्षातील नेते स्वतःहून भाजप शिवसेनेत येत आहेत. शरद पवार यांचे वय झालेले असले तरी ते एकटेच किल्ला लढवत आहेत. मला त्यांचे कौतूक वाटते. मात्र, त्यांना २०१४ एवढ्याही जागा या निवडणूकीत मिळणार नाहीत. तर महायुती २३० ते २४० जागा जिंकुन सत्ता स्थापन करेल. लोकसभेप्रमाणे विधानसभेत ही काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद मिळणार नाही. इव्हीएममध्ये कोणताही दोष नाही. पण माणसांची मनाची मशिन आमच्या सोबत आहे. सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे जिंकले तेथे इव्हीएम नव्हते का? त्यामुळे यावर संशय घेणे योग्य नाही. राज ठाकरे यांचा एक ही आमदार निवडून येत नाही, त्यामुळे ते इव्हीएमला दोष देत आहेत,'' अशी टीका आठवले यांनी केले.
''वंचितांना वंचित ठेवण्याचे काम प्रकाश आंबेडकर करत आहेत. वंचित बहुजन आघाडीने आम्हाला फरक पडणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा रिपब्लिकन पक्ष जिवंत ठेवण्याचे खरे काम मी करत आहे. त्यांना रिपब्लिकन पक्ष वाढवायचा असेल तर माझ्या सोबत यावे'' असे आवाहन आठवले यांनी आंबेडकर यांना केले.
''पुणे महापालिकेच्या निवडणुकीत जे आश्वासन दिले ते पूर्ण केले असे नाही. पण, विधानसभेत रिपाइंचे पाच आमदार निवडून येतील, त्यांचा वेगळा गट करणार आहे. राज्याच्या सत्तेत आम्हाला एक कँबीनेट, एक राज्यमंत्री, ३ विधान परिषद , ४ महामंडळे मिळणार असून यातील ३ भाजपकडून एक सेनेकडून मिळणार आहे,'' असे आश्वासन दोन्ही पक्षांनी दिल्याचा दावा आठवले यांनी केला.
''भाजपने पाच रुपयात जेवण देण्याचे आश्वासन दिले आहे, तर शिवसेना १० रुपयात थाळी देणार आहे. यामुळे रिपाइंकडूनही आठ रुपयात थाळी देण्याचा विचार करत आहोत. मात्र, आता या दोघांचीही थाळी खावून पहातो, मग माझ्या थाळीचा निर्णय घेतो,'' असे मिश्कील उत्तर आठवले यांनी दिले.