
नको विरोधाचे ‘नाटक’, हवा ‘संवादा’वर भर!
पुण्यात कोणत्याही सार्वजनिक विकासकामाच्या नवीन प्रस्तावावर सहसा लवकर एकमत होत नाही, असा सर्वसाधारण अनुभव आहे. मेट्रोचाही प्रकल्प दीर्घकाळ चर्चेच्या गुऱ्हाळात अडकला होता. त्याबद्दल अजित पवार, नितीन गडकरी आदींसह अनेक नेत्यांनी वेळोवेळी जाहीरपणे टिप्पणी केली आहे. अशा बहुचर्चित प्रकल्पांच्या यादीत आता बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा मुद्दा पुन्हा आला आहे...
चार वर्षांपूर्वीचा प्रस्ताव
‘बालगंधर्व’ हे सर्वाधिक रसिकप्रिय नाट्यगृह. कधीकाळी शहराची शान म्हणून ओळखली जाणारी ही वास्तू काही वर्षांपासून तेथील गैरसोयींबद्दल वेळोवेळी चर्चेत येत असते. ‘कोरोना’, टाळेबंदी यांमुळे दीड-दोन वर्षे नाट्यगृहाचे दरवाजे बंदच होते; परंतु त्याआधी आणि आता नाट्यक्षेत्रातील परिस्थिती पूर्ववत होत आल्यावरही तेथील दुरवस्थेचे मुद्दे कायम आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि नाट्यगृहाला नवी झळाळी देण्यासाठी त्याच्या पुनर्विकासाचा विषय प्रथम २०१८ मध्ये पुढे आला. महापालिकेच्या स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचा पुढाकार त्यात होता. त्या वेळी या प्रकल्पाचा विषय जाहीर होताच, कला क्षेत्रातील काही जणांकडून त्याला विरोध सुरू झाला. त्यावेळचे एकंदर वातावरण पाहून या विषयाला पुढे गती मिळाली नाही. नंतर ‘कोरोना’मुळे सगळेच ठप्प झाले.
मुंबईतील संकुलाचा अभ्यास
आता या प्रकल्पाच्या अनुषंगाने पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढे नाट्यगृहाच्या आराखड्यांचे सादरीकरण झाल्यावर, त्यात त्यांनी काही बदल सुचविले आहेत. यासंदर्भात मुंबईतील एका संकुलाचे उदाहरण देऊन त्यांनी त्याचा अभ्यास करण्याबाबत महापालिका अधिकाऱ्यांना सांगितले आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू झाली आहे.
नाट्यगृहाची आबाळ
दरम्यान, सध्याची वास्तू पाडण्याच्या प्रस्तावावर अनेकांनी टीका सुरू केली आहे. ‘शहराच्यादृष्टीने हा एक सांस्कृतिक वारसा आहे, त्यावर घाला घालू नये. नाट्यगृह पाडण्याऐवजी त्याची दुरुस्ती करावी,’ असे त्यांचे म्हणणे आहे. यात भावनिक मुद्दा जास्त आहे. या नाट्यगृहाला ५४ वर्षे झाली आहेत. एखाद्या वास्तूच्या वा संस्थेच्यादृष्टीने हे ‘वय’ जास्त नाही; पण देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली आजवर लाखो रुपये खर्च होऊनही या नाट्यगृहाची अवस्था जर्जर झाली आहे. प्रेक्षागृहातील खुर्च्या, स्वच्छतागृह, ध्वनिव्यवस्था, प्रकाशयोजना अशा अनेकविध व्यवस्थेवर रंगकर्मींनी सातत्याने नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे ‘बालगंधर्व’चा संपूर्ण कायापालट करण्याच्या विचाराने जोर धरला आहे.
कामाचा कालावधी किती?
हे नाट्यगृह पुनर्विकासासाठी पाडण्यास विरोध होण्यामागे जसे भावनिक कारण आहे, तसेच नाटकांचे अर्थकारणही आहे. त्याच्या फेरउभारणीस नेमकी किती वर्षे लागतील, निर्धारित वेळेत हे काम पूर्ण होईल काय, याविषयी नाट्यक्षेत्रात साशंकता आहे. शहरात १४ नाट्यगृहे असली, तरी ‘बालगंधर्व’च्या खालोखाल प्रामुख्याने ‘यशवंतराव चव्हाण’ (कोथरूड) आणि ‘अण्णा भाऊ साठे’ (बिबवेवाडी) या नाट्यगृहांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. त्यातील ‘बालगंधर्व’च बंद राहिले, तर आपल्या नाट्यप्रयोगांचे काय होणार, अशी रास्त चिंता रंगकर्मींना वाटत आहे. ती दूर करण्यासाठी पर्यायी नाट्यगृहांतील त्रुटी तातडीने दुरुस्त केल्या पाहिजेत.
अधिक सुविधांची अपेक्षा
प्रस्तावित आराखड्यात वेगवेगळ्या आसनक्षमतेची तीन नाट्यगृहे, तीन कलादालने, तसेच पार्किंगसह अन्य उच्च प्रतीच्या सुविधा समाविष्ट आहेत. महामेट्रोशी पूरक व्यवस्थाही नजीकच्या भागात अपेक्षित आहे. नवी वास्तू मूर्त स्वरूपात येईपर्यंत काही काळ गैरसोय सहन करावी लागेल; पण या प्रतीक्षेचे चीज होईल आणि एक दिमाखदार नाट्यसंकुल पुणेकरांच्या सेवेत दाखल होईल, अशी अपेक्षा आहे. महापालिकेच्या म्हणण्यानुसार, सध्याचे नाट्यगृह सद्यःस्थितीत कायम राहिले, तर येत्या दहा-पंधरा वर्षांत त्याची अवस्था खूपच बिकट होणार आहे. याचा अर्थ ही वास्तू आज ना उद्या पाडावी लागणारच आहे. मग त्यात कालापव्यय करण्यात हशील काय? नवीन रस्ता, पूल, जलवाहिनी, ड्रेनेजलाइन यांची कामे करताना काही दिवस-आठवडे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. विस्तारित नगराच्या गरजा लक्षात घेऊन, ही कामे करणे अपरिहार्य असते. भविष्यकाळ अधिक सुखसोयींयुक्त होण्यासाठी त्याला पर्याय नसतो. हीच गोष्ट या विषयालाही लागू पडते.
पूर्वग्रह दूर ठेवण्याची गरज
बदल नकोच, ही स्थितिवादी भूमिका घेण्याऐवजी, नव्या नाट्यसंकुलाचा आराखडा सर्वसंबंधितांच्या संवादातून संमत होईल, त्याचे काम निर्धारित कालावधीत पूर्ण होईल, मुख्य म्हणजे नंतर त्याच्या देखभालीची व्यवस्था चोख असेल, यासाठी आग्रह धरण्याची गरज आहे. हे सर्व प्रत्यक्षात येण्याकरिता निर्णयप्रक्रियेतील मंडळींनी आपले पूर्वग्रह बाजूला ठेवून एकमेकांचे विचार खुल्या मनाने समजून घेण्याची गरज आहे.
Web Title: Ramesh Doiphode Writes Balgandharva Theater Drama
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..