रावेत बंधाऱ्यातून प्रतिदिन १०० एमएलडी जादा पाणी महापालिका उचलणार

water
water

पिंपरी - वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पवना नदीवरील रावेत बंधाऱ्यातून प्रतिदिन १०० दशलक्ष लिटर (एमएलडी) जादा पाणी महापालिका उचलणार आहे. त्यापोटी पाटबंधारे विभागाकडे दंडाची रक्कम भरणार आहे. यासाठी रावेत अशुद्ध जलउपसा केंद्रातील यंत्रांची आणि निगडीतील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविण्यात येणार आहे. यासाठी सुमारे ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याबाबतच्या विषयास महापालिका सर्वसाधारण सभेने सोमवारी (ता. २०) मंजुरी दिली.

पाटबंधारे विभागाने पवना धरणातील पाणी शहरासाठी आरक्षित केले आहे. रावेत येथे नदीवर बंधारा बांधून अशुद्ध जलउपसा केला जात आहे. निगडी- प्राधिकरणातील सेक्‍टर २३ मधील जलशुद्धीकरण केंद्राद्वारे पाण्याचे वितरण होत आहे. मात्र, शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणी वाढत आहे. त्यासाठी रावेत बंधाऱ्यातून प्रतिदिन १०० एमएलडी जादा पाणी उचलण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. त्यासाठी अशुद्ध जलउपसा केंद्रांतील पंपाची आणि निगडी जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढवावी लागणार आहे. या कामाच्या खर्चापोटी महापालिका अर्थसंकल्पात ‘विशेष योजना’ लेखा शिर्षाखाली नव्याने समावेश करावा लागणार आहे. त्यासाठीच्या ५० कोटी रुपयांच्या प्रशासकीय खर्चास मान्यता देण्यासाठीचा ऐनवेळचा विषय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सर्वसाधारण सभेपुढे ठेवला होता. त्यास सभेने मंजुरी दिली. अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या. वाढीव पाण्याची गरज व सद्यःस्थिती याबाबतची वस्तुस्थिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांनी मांडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com