खुल्या परवान्यामुळे रिक्षांची संख्या दुप्पट

चिंचवड स्टेशन - चिंचवडगावाकडे जाणाऱ्या मार्गावर बेकायदा उभ्या असलेल्या रिक्षा.
चिंचवड स्टेशन - चिंचवडगावाकडे जाणाऱ्या मार्गावर बेकायदा उभ्या असलेल्या रिक्षा.

पिंपरी - रिक्षा परवाना खुले झाल्यामुळे शहरातील रिक्षांची संख्या जवळपास दुप्पट झाली असून, त्यांच्यासाठी पुरेसे थांबे नसल्यामुळे अनेक रस्त्यांवर व चौकालगत वाहतुकीला अडथळा करीत या रिक्षा थांबलेल्या दिसून येत आहेत.  

सरकारने सहा महिन्यांपूर्वी रिक्षांसाठी परवाना खुला केला. त्यामुळे शहरात नवीन तब्बल पाच हजार रिक्षा रस्त्यावर आल्या. त्यांच्यासाठी महापालिका अथवा वाहतूक पोलिसांनी फारशा सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. रिक्षा थांब्यांचीही संख्या वाढविली नाही. त्याचा परिणाम पूर्वीच्या रिक्षाचालकांच्या व्यवसायावर झाला. तसेच, शहराच्या वाहतूक व्यवस्थेवरही झाला.

चिंचवड गावात चापेकर चौकात पुलाखालीच रिक्षा उभ्या असतात. चापेकर चौकाकडून बसस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर डाव्या बाजूलाही बेकायदेशीररीत्या रिक्षा उभ्या  केल्या जातात. वळणावरील या रिक्षांमुळे अपघाताची शक्‍यता वाढली आहे.

पिंपरी येथील इंदिरा गांधी उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूला बेकायदा थांबे आहेत. शगुन चौकाकडून या पुलावर वाहनांना जाण्यास बंदी आहे. मात्र, या रिक्षा पुलावर रिक्षा धावताना दिसतात. मात्र, पोलिस कारवाई करताना दिसत नाहीत, अशी चालकांची तक्रार आहे. 

मोरवाडी चौकातून इंदिरा गांधी पुलावर जाण्यासही बंदी आहे. मात्र, अनेक रिक्षा व्यावसायिक या नियमाचे सर्रास उल्लंघन करून प्रवासी घेण्यासाठी पुलावर जातात. तरीही वाहतूक पोलिस त्यांना साधे हटकतानाही दिसत नाहीत. मोरवाडी चौकाकडून एका मॉलकडे जाणाऱ्या मार्गावर उजव्या बाजूलाही रिक्षा उभ्या असतात. या मार्गावर विरुद्ध दिशेनेही वाहने येत असतात. त्यामुळे तेथे वारंवार कोंडी होते. निगडी येथील टिळक चौक, आकुर्डी येथील खंडोबा माळ परिसर येथेही रिक्षा बेकायदा उभ्या असल्याने वाहतुकीच्या समस्या उद्‌भवतात.

रिक्षा व्यावसायिक सरकारचे सर्व कर भरतात. खुल्या परवाना धोरणामुळे वाढत्या रिक्षांसाठी थांबा उपलब्ध करून देणे, ही प्रशासनाची जबाबदारी आहे. पोलिस आयुक्त आर. के. पद्‌मनाभन यांच्याकडे आमच्या संघटनेने रिक्षाथांबे उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. 
- बाबा कांबळे, अध्यक्ष, महाराष्ट्र रिक्षा पंचायत

कोणत्याही चौकाच्या परिसरातील १५ मीटरपर्यंतच्या अंतरावर रिक्षा उभ्या करता येणार नाहीत. त्यामुळे चौकातील कोपऱ्यांना अडथळा निर्माण होतो. रिक्षा व्यावसायिकांनी रिक्षाथांब्याची मागणी केल्यास योग्य तो निर्णय घेण्यात येईल. 
- सतीश पाटील, सहायक पोलिस आयुक्त 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com