

कवठे येमाई, ता. १२ : शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी परिसरात वाढत्या चोऱ्या, घरफोड्या आणि पुन्हा फोफावलेल्या अवैध दारूधंद्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पोलिसांच्या सुस्त कारभारामुळे असुरक्षिततेचे वातावरण पसरले असून, नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे व केवळ ‘सर्व काही आलबेल’ असल्याचा फार्स केला जात असल्याचा आरोप होत आहे.
टाकळी हाजी दूरक्षेत्राच्या हद्दीतील कवठे येमाई, मलठण, चांडोह, सविंदणे, जांबूत परिसरात कृषिपंप, केबल आणि विद्युत रोहित्र चोऱ्यांच्या घटनांनी शेतकरी हवालदिल झाले आहेत. काही ठिकाणी दिवसाढवळ्या घरफोड्या होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चोरीची तक्रार देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांकडे पंपाची पावती व खरेदीची कागदपत्रे मागितली जात आहेत. मात्र, चोरट्यांचा शोध आणि मुद्देमाल परत मिळण्याबाबत ठोस कार्यवाही होत नसल्याने अनेक शेतकरी तक्रार देण्यासही टाळाटाळ करत आहेत.
याचबरोबर, परिसरात अवैध दारूविक्री पुन्हा जोमाने सुरू असून, काही ठिकाणचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होऊनही कारवाई होत नसल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अवैध धंद्यांबाबत ‘हप्ता’वसुलीच्या चर्चांना पेव फुटले असून, या प्रकाराची वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. काही दिवसांपूर्वी दूरक्षेत्रातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा लाच स्वीकारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आधीच नाराजी असताना, आता अवैध धंद्यांकडे होणारे दुर्लक्ष आणि चोरीच्या गुन्ह्यांचा रखडलेला तपास यामुळे संताप अधिक तीव्र झाला आहे.
टाकळी हाजी दूरक्षेत्राला आंबेगाव, जुन्नर तसेच अहिल्यानगर जिल्ह्याची हद्द लागून असल्याने बाहेरील टोळ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. मात्र, प्रभावी रात्रगस्त आणि नाकाबंदीअभावी गुन्हेगारी वाढत असून, ‘रात्रगस्त नेमकी कुठे आहे?’ असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.
दोन महिन्यांपूर्वी धडक, आता थंड
सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांच्या आंदोलनानंतर पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार एप्रिल-मे महिन्यात टाकळी हाजी दूरक्षेत्रात तब्बल २२ कारवाया करत अवैध दारूच्या भट्ट्या जेसीबीने उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या. मात्र, आता दोन महिन्यांतच कारवाईचा वेग पूर्णपणे मंदावल्याने अवैध धंदे पुन्हा सुरू झाले आहेत.
अवैध धंदे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नागरिकांनी अवैध धंद्यांबाबतची माहिती थेट माझ्यापर्यंत पोहोचवावी. उपविभागीय कार्यालयाकडील स्वतंत्र पथकाकडून कारवाई केली जाईल. स्थानिक अधिकारी व कर्मचारी कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावरही जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल.
- रवींद्र भोसले, उपविभागीय पोलिस अधिकारी, शिरूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.